स्वातंत्र्यानंतर काही थोर लोकांचे, भारतीय संस्कृतीचे व मूल्यांचे योगदान मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र आता देश भूतकाळातील चुका सुधारत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसला कोपरखळी हाणली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या होलोग्राम पुतळय़ाचे अनावरण मोदी यांनी इंडिया गेट येथे केले. २०४७ साली स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षांपूर्वी ‘नव्या भारताच्या’ निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यापासून जगातील कुठलीही शक्ती भारताला रोखू शकत नाही, असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘करू शकतो’ आणि ‘करीन’ या भावनेपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन मोदी यांनी लोकांना केले. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर अनेक थोर लोकांचे आणि देशाच्या संस्कृतीचे योगदान मिटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आज स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनी देश या चुका दुरुस्त करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. याच कार्यक्रमात २०१९, २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांसाठी ‘सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार’ प्रदान केले. एकूण सात पुरस्कार या वेळी देण्यात आले.