सहारा इंडिया चे संस्थापक सुब्रतो रॉय यांचं १४ नोव्हेंबरच्या रात्री मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह या व्याधी होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुब्रतो रॉय यांचं आयुष्य हे खूपच संघर्षातून पुढे आलं होतं. त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावला आणि खालवलाही. आपण जाणून घेऊ त्यांच्या याच प्रवासाविषयी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुब्रतो रॉय व्यवसाय क्षेत्रातलं मोठं नाव

बिहारच्या अररिया जिल्ह्यात १० जून १९४८ या दिवशी सुब्रतो रॉय यांचा जन्म झाला होता. व्यवसाय क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून सुब्रतो रॉय ओळखले जात. कारण त्यांनी सहारा इंडिया नावाचं एक साम्राज्यच तयार केलं होतं. फायनान्स, रिअल इस्टेट, मीडिया, हॉस्पिटॅलिटीसह अनेक क्षेत्रांमध्ये सहारा इंडियाने भरारी घेतली होती. सुब्रतो रॉय यांनी १९७८ मध्ये सहारा इंडिया समूहाची स्थापना केली होती.

सहारा या शब्दाचा अर्थ होतो मदत. सुब्रतो रॉय यांनी गोरखपूर टेक्निकलमधून मॅकेनिकल इंजिनिअरींग केलं. १९७६ मध्ये त्यांनी चिटफंड कंपनी स्थापन केली होती. या चिटफंड कंपनीचं नाव पुढे सहारा इंडिया असं ठेवण्यात आलं. ज्यानंतर सहारा इंडिया समूह हा भारतातल्या व्यवसाय क्षेत्रातला मोठा समूह झाला होता.

सहारा समाचार हे वृत्तपत्र सुरु

१९९२ मध्ये सहारा समाचार या नावाने वृत्तपत्र सुरु झालं. त्यानंतर सहारा वन या नावाने चॅनलही सुरु करण्यात आलं होतं. १९९० च्या दशकात पुण्यातल्या अँबी व्हॅली या महत्वाकांक्षी सिटी योजनेची सुरुवात करण्यातही सुब्रतो रॉय यांचा सिंहाचा वाटा होता. २००० मध्ये सहाराने लंडनचं ग्रोसव्हेनर हाऊस हॉटेल आणि न्यूयॉर्क शहरातलं प्लाझा हॉटेल अधिग्रहीत केलं.ज्यामुळे सहारा इंडिया हे नाव जगभरात चर्चेत आलं.

टाइम मॅगझीनने घेतली दखल

सहारा हा इतका मोठा समूह झाला की टाइम मॅगझिनने त्यांची दखल घेतली. भारतीय रेल्वेनंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक कर्मचारी काम करत असलेला समूह ठरला होता सहारा इंडिया समूह. टाइमने जेव्हा त्यावर विशेष लेख लिहिला तेव्हा सहारा इंडिया समूहात १२ लाख कर्मचारी काम करत होते. तसंच त्यावेळी त्यांच्याकडे ९ कोटींहून अधिक गुंतवणूकदार होते असाही दावा कंपनीने केला होता.

आणि सहाराला उतरती कळा

अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुब्रतो रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते सध्या जामिनावर बाहेर होते. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सहारा इंडियाचा दावा आहे की, त्यांनी संपूर्ण रक्कम सेबीकडे जमा केली आहे.

२०१० नंतर मात्र या समूहाला उतरती कळा लागली. कारण व्यवसाय क्षेत्रात आपलं साम्राज्य उभं करणारे सुब्रतो रॉय यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. २०१४ मध्ये सेबीशी झालेल्या वाद प्रकरणात सुब्रतो रॉय हे सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले नाहीत. ज्यानंतर सुब्रतो रॉय यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. एक मोठी कायदेशीर लढाई लढत असताना सुब्रतो रॉय यांना तिहार जेलमध्येही ठेवण्यात आलं होतं. त्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता. एके काळी आपलं साम्राज्य उभं करणारे सुब्रतो रॉय हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did subrata roy create sahara india why did he have to go to tihar jail scj