डोकलामसारखा संघर्ष पुन्हा घडू नये यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशमधील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. त्याचप्रमाणे दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात गस्तही वाढवली आहे. चीनची भूप्रदेशाची भूक आणि वाढत्या महत्वकांक्षा लक्षात घेऊन भारताकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्यावर्षी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. जवळपास ७३ दिवस हा संघर्ष चालला. चीनने वारंवार युद्धाची भाषा करुन धमक्या दिल्या पण भारताने संयमाने हा विषय हाताळला. डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव, संशय, अविश्वासाचे वातावरण अद्यापही पूर्णपणे दूर झालेले नाही.

तिबेटला लागून असणाऱ्या सीमेवर रणनितीक दृष्टया महत्वाच्या भागातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली टेहळणी क्षमता अधिक मजबूत करत आहे तसेच नियमित आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी डोंगराळ भागावर आपली पकड आणि वर्चस्व ठेवण्याची भारताची रणनिती आहे.

डोकलामच्या संघर्षानंतर आम्ही देखील आमची तयारी वाढवली आहे. कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे किबीथु येथे तैनात असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये मागच्या वर्षी १६ जूनला सुरु झालेला संघर्ष २८ ऑगस्टला संपला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India increases troops deployment along border with china