पीटीआय, टोरांटो : भारत आणि कॅनडादरम्यान वाढलेल्या तणावात भारताने केलेल्या काही उपाययोजनांवर कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेअर यांनी चिंता व्यक्त केली. तसेच प्रतिबंधित केटीएफचा प्रमुख हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासामध्ये भारताने सहकार्य करावे आणि ही समस्या योग्य मार्गाने सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे अशी विनंतीही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जूनमध्ये कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात सरे येथे गुरुद्वाराबाहेर निज्जरची हत्या झाली होती. त्यामध्ये भारताचा हात असल्याची शक्यता असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे वक्तव्य पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पार्लमेंटमध्ये केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने ट्रुडो यांचे आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, तसेच भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे थांबवले. ‘सीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना, ब्लेअर यांनी भारताने केलेल्या उपायांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘कॅनडामध्ये मोठय़ा प्रमाणात भारताशी संबंधित लोक राहतात. त्यांचे भारतामध्ये कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे भारताने केलेल्या उपायांबद्दल आपल्याला चिंता वाटते.

निज्जरच्या हत्येसंबंधी आमच्याकडे विश्वसनीय पुरावे आहेत अशी आमची खात्री आहे आणि कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.’ या प्रकरणात आपण कोणत्याही सूत्रांची किंवा माहितीची पुष्टी करणार नाही किंवा ओळख पटवणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात आमच्या होती कोणते किंवा कशा प्रकारचे पुरावे लागले आहेत त्याबाबतही आम्ही आताच काही सांगणार नाही असे ब्लेअर यांनी स्पष्ट केले. यासंबंधीची माहिती कॅनडा आणि आमच्या मित्र देशांसाठी महत्त्वाची आहे असे ब्लेअर यांनी सीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीला सांगितले. भारताने तपासात सहकार्य केले तर दोन्ही देशांना सत्य काय ते कळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India visa ban decision worries canada nijjar murder case ysh