Indore Couple : माझा मृत्यू नव्हे, माझी हत्या करण्यात आली आहे या आशयाचा मजकूर असलेली पोस्टर्स राजा रघुवंशीच्या अंत्ययात्रेत झळकली. या पोस्टर्सने लक्ष वेधलं आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर २० मे रोजी ते बंगळुरुला गेले, त्यानंतर ते गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले होते. २२ तारखेला हे दोघंही मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले. २३ मेपासून या दोघांचाही त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला. त्यांना शोधण्यासाठीची शोधमोहीम सुरु होती. त्या दरम्यान २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. त्याच्या पत्नीचा म्हणजेच सोनमचा शोध अजूनही घेतला जातो आहे. दरम्यान राजा रघुवंशीचं पार्थिव त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आलं. त्याच्या अंत्य यात्रेत माझा मृत्यू झाला नाही तर हत्या झाली आहे या आशयाचे पोस्टर झळकले. ज्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनम बाबत राजाच्या भावाने काय म्हटलं आहे?

सोनमचा काहीही पत्ता अद्याप लागलेला नाही. त्याबाबत आता राजाचा भाऊ विपिन याने माध्यमांना सांगितलं आहे की ती सापडेल असं वाटत नाही. ती ज्या प्रकारे गायब झाली आहे त्यावरुन असं वाटतं आहे की ती बहुदा फरार झाली असावी. राजाच्या भावाने हा संशय व्यक्त केल्याने सोनमचं नेमकं काय झालं? याचं उत्तर अद्यापही संशयाच्या सुईभोवतीच फिरत ठेवलं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणाचा तपास जर सीबीआयकडे सोपवला तर राजाचे मारेकरी पकडले जातील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असंही राजाच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

२३ मे पासून दोघांचा कुटुंबाशी संपर्क तुटला

२३ मे रोजी आम्ही शिलाँगला जात आहोत तिथून फोन करतो असं या दोघांनीही कुटुंबाला सांगितलं होतं. मात्र शिलाँगला ते दोघंही गेल्यापासून त्यांचा संपर्क तुटला. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवतं होतं. या दोघांनीही शिलाँगमध्ये फिरण्यासाठी भाडे तत्त्वावर फिरण्यासाठी मिळणारी अॅक्टिव्हा घेतली होती अशीही माहिती समोर आली. २३ मेच्या दिवशी काहीही संपर्क झाला नाही. तसंच २४ मे रोजीही काही संपर्क झाला नाही. त्यामुळे राजा आणि सोनम दोघांच्याही कुटुंबांची काळजी वाढली. शिलाँग या ठिकाणच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी हे दोघं गेले होते अशी माहिती त्यांनीच दिली होती. पर्वतरांगांमध्ये मोबाइलला रेंज नसेल असं दोघांच्या कुटुंबाला वाटलं होतं. पण दोन दिवस संपर्क न झाल्याने राजा आणि सोनम दोघांच्याही कुटुंबांची चिंता वाढली.

राजा रघुवंशीची हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. (फोटो-ANI)

२४ मे ते २ जून या कालावधीत सुरु होतं शोधकार्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर दोघांच्याही घरच्यांची चिंता आणखी वाढली. पण हे दोघंही बेपत्ता झाले असतील असं समजून या दोघांच्या भावांनी आणि पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु ठेवला. अखेर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह १५० फूट खोल दरीत सापडला. ज्या ठिकाणी या दोघांनी वापरलेली अॅक्टिव्हा सापडली होती तिथून साधारण २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. राजाची पत्नी सोनम मात्र अजूनही बेपत्ता आहे, तिचा शोध पोलीस घेत आहेत.

राजा रघुवंशीचा मृतदेह कसा मिळाला? ओळख कशी पटली?

११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांच्या ड्रोनला दिसला. हा मृतदेह १५० फूट खोल दरीत होता. तसंच मृतदेह इतका सडला होता की त्याची ओळख पटवणं कठीण होतं. अखेर या मृतदेहाच्या हातावर राजा हे नाव गोंदलेलं होतं त्यावरुन त्याच्या भावाने मृतदेहाची ओळख पटवली. राजाची पत्नी सोनम अद्यापही बेपत्ता आहे. सोनम कुठे आहे? राजाचा मृत्यू कसा झाला? हे सगळे प्रश्न अद्यापही कायम आहेत. पोलिसांना राजाचा मृतदेह इस्ट खासी हिल्स भागात सापडला. ही हत्या असावी असाही संशय पोलिसांना आहे. २३ मे रोजी हे जोडपं बेपत्ता झाल्यापासून पोलीस, एसडीआरएफ, गिर्यारोहण क्लबतर्फे या दोघांचा शोध सुरु होता. अजूनही राजाच्या पत्नीचा शोध सुरु आहे. ज्या ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जात होती त्या ठिकाणी वातावरणात सारखे बदल होत होते. पाऊस पडणं, उन पडणं, पुन्हा पाऊस पडणं या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. २ जूनला पोलिसांच्या ड्रोनने १५० फूट खोल दरीत एक मृतदेह आहे हे शोधलं. हा भाग दुर्गम असल्याने या ठिकाणी मृतदेह काढण्यासाठीही बराच वेळ लागला. २ जूनच्या दिवशी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान हा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.