अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता असलेल्या किशोरवयीन मुलाला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराकडे सोपवले आहे, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी दिली. अपर सियांग जिल्ह्यातील जिडो खेडय़ाचा रहिवासी असलेला १९ वर्षांचा मिराम तारो हा १८ जानेवारीला बेपत्ता झालाहोता. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीसह आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे रिजिजू यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले. आपल्या हद्दीत एक मुलगा आढळला असल्याचे चीनने २० जानेवारीला भारतीय लष्कराला कळवले होते आणि त्याची ओळख पटवण्यासाठी आणखी तपशील देण्याची विनंती केली होती, असे लोकसभेत अरुणाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे रिजिजू यांनी मंगळवारी सांगितले होते.