पीटीआय, नवी दिल्ली
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील ५,००० फूट उंचीवरील डोंगराचा सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून गुरुवारी ताबा घेतला. हा डोंगर नक्षलवाद्यांचा केंद्रबिंदू होता. अनेक नक्षलवादी या डोंगरावर वास्तव्यास होते. नऊ दिवसांच्या विशेष मोहिमेनंतर नक्षलवाद्यांना हाकलून लावण्यास सुरक्षा दलांना यश आले.
घनदाट जंगलात असलेला हा खडकाळ डोंगर हिडमा, देवा, दामोदर, आझाद आणि सुजाता यांसारख्या क्रूरकर्मा नक्षलवादी म्होरक्यांचे आश्रयस्थान होते. मात्र आता हा डोंगर पूर्णपणे सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे, ज्यावर तिरंगा फडकवण्यात आला आहे, असे सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या नक्षलवादविरोधी कारवाईंपैकी एक असलेल्या या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), राज्य पोलिसांचे सर्व विभाग, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्यांच्या एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) यांसह विविध विभागांचे सुमारे २४,००० सुरक्षा कर्मचारी सहभागी होते.
सुमारे ५,००० फूट उंचीवर असलेल्या या मोक्याच्या उंचीच्या ठिकाणी ताबा मिळविण्यासाठी सैन्याने नऊ दिवसांच्या कालावधीत चढाई पूर्ण केली, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यकतेनुसार सूचना देत आहेत, असे त्यांनी सांगितले. सीआरपीएफचे महासंचालक जी.पी. सिंह यांनी बुधवारी कारेगुट्टा येथील कारवाईच्या ठिकाणी भेट देऊन या डोंगरावर ताबा मिळवल्याचे सांगितले.