नवी दिल्ली : भारतात विकसित करण्यात आलेले तसेच तब्बल ६००० किमी पेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची गुरुवारी ओडिशाच्या समुद्रात अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी ९.५३ वाजता या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नी-५ क्षेपणास्त्रात आण्विक हत्यारे वाहून नेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र अँटी बॅलेस्टिक मिसाइल पद्धतीविरोधात कारवाई करता येणार आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये संपूर्ण चीन आणि पाकिस्तान हे देश येतात.

अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रे डीआरडीओने विकसित केली आहेत. पृथ्वी आणि धनुष सारख्या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांशिवाय भारताच्या खात्यात अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ ही क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेऊन यांची निर्मिती करण्यात आली आहे. तर, अग्नी-४ आणि अग्नी-५ या क्षेपणास्त्रांची निर्मिती चीनला लक्षात घेऊन करण्यात आली आहे.

या अग्नी-५ क्षेपणास्त्राची क्षमता आवाजाच्या वेगापेक्षा २४ टक्के जास्त आहे. याची उंची १७ मीटर असून व्यास २ मीटर आहे. तर याचे वजच ५० टन इतके आहे. दीड टनांपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता आहे.