उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवड्याभराच्या आता रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या देखरेखीखाली तपास समितीचे कामकाज चालणार आहे. या समितीमध्ये महिलेसह दलित समाजातील सदस्याचाही समावेश करण्यात येणार आहे. पीडित तरुणीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले. तिच्या शरीरावर जखमा होत्या.
आणखी वाचा- मोदींनी घेतली हाथरस सामूहिक बलात्काराची दखल, योगींना फोन करुन दिला आदेश; म्हणाले…
उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर चहूबाजूंनी जोरदार टीका सुरु आहे. त्यामुळे तात्काळ या तपास समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागच्या काही आठवड्यांपासून पीडित तरुणीचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. अखेर काल दिल्लीतील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.