Ahmedabad Plane Crash 2025: २३ जून १९८५ रोजी ‘एअर इंडिया १८२’ हे विमान आयर्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे १९० किमी अंतरावर हवेतच बॉम्बस्फोट होऊन अटलांटिक महासागरात कोसळले. यात ३२९ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. हे बोईंग ७४७ विमान ‘एम्परर कनिष्क’ या नावाने प्रसिद्ध होते.
खलिस्तानवादी अतिरेक्यांचे कृत्य
हे विमान मॉन्ट्रियलहून दिल्लीमार्गे मुंबईकडे जात होते. कॅनडामधील खलिस्तानवादी अतिरेक्यांनी त्यामध्ये बॉम्ब ठेवलेला होता. ३१ हजार फूट उंचीवर झालेला हा स्फोट, अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचा जगातील सर्वात मोठा प्राणघातक दहशतवादी हल्ला ठरला आणि कॅनडामधील आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला.
कनिष्कचा स्फोट हवेतच
गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर भारतीय विमान प्रवासातील अनेक दुर्घटनांच्या स्मृती जागृत झाल्या आहेत. त्याच दुर्दैवी घटनांमधील एक घटना म्हणजे एअर इंडियाच्या कनिष्क या विमानाचा हवेतच झालेला स्फोट. या स्फोटात ३२९ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता.
प्रथमदर्शनी अपघात नोंद
प्रथमदर्शनी या घटनेची नोंद अपघात म्हणून करण्यात आली होती. ३१ हजार फूट उंचीवर झालेला हा स्फोट ९/११ च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा जगातील सर्वात प्राणघातक हवाई दहशतवादी हल्ला ठरला होता. यात ३२९ नागरिक व विमानातील कर्मचारी होते. त्यातील दोनशेहून अधिक कॅनडाचे नागरिक होते. हा स्फोट खलिस्तानवाद्यांनी घडवून आणला होता. हे विमान टोरांटो ते लंडन व पुढे मुंबईसाठी रवाना होणार होते.
हल्ला आणि बळी
- या दुर्घटनेत २६८ कॅनेडियन नागरिकांचा, २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.
- अनेक प्रवासी सुट्टीसाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात जात होते.
- मृतांमध्ये ८२ बालकं, संपूर्ण कुटुंबं आणि ४५ एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे नातेवाईक होते. हा साखळी बॉम्ब हल्ला होता.
दुसरा स्फोट अकस्मात
- या साखळीतील दुसरा स्फोट जपानमधील नारीता विमानतळावर होणार होता. परंतु, प्रत्यक्ष घटनेच्या आधीच दुसरा बॉम्ब अकस्मात फुटला आणि दोन जपानी कामगारांचा मृत्यू झाला.
- दोन्ही बॉम्बस्फोट जर नियोजित वेळेवर झाले असते, तर ही घटना आणखी भयावह ठरली असती.
- या स्फोटात क्रू सदस्यांसह सगळे मृत्युमुखी पडले, तरी प्रत्यक्ष फक्त १३२ मृतदेह सापडले. उर्वरित मृतदेह समुद्रात खोल तळाशी गेले. अनेकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला.
कोण होते जबाबदार?
- या कटाचे सूत्रधार तलविंदर सिंग परमार (बब्बर खालसा या खलिस्तानी अतिरेकी संघटनेचा संस्थापक) आणि ब्रिटीश-कॅनेडियन नागरिक इंदरजित सिंग रेयात (ब्रिटिश कोलंबियामध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता) हे दोघे होते.
- रेयातने Micronta घड्याळं, Sanyo tuner रेडिओ आणि डायनामाइट वापरून बॉम्ब तयार केला होता.
- अन्य आरोपींमध्ये अजैब सिंग बागरी, रिपुदमन सिंग मलिक आणि हरदियाल सिंग जोहल यांचा समावेश होता.
- रेयात याला निर्घृण हत्याकांड आणि खोटी साक्ष दिल्याबद्दल शिक्षा झाली.
साक्षीदारांचे खून…
बागरी आणि मलिक यांना २००५ साली अपुऱ्या पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणात काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे खून झाले, तर काहींनी साक्ष देण्यास नकार दिला.
इशारे आणि दुर्लक्ष
या हल्ल्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्याआधी अनेक वेळा इशारे मिळाले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले होते. कॅनेडियन गुप्तचरांकडे बॉम्ब चाचण्या आणि संशयास्पद हालचालींची माहिती होती. तरीही CSIS आणि RCMP यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
चुकांची साखळी
विशेष म्हणजे, CSIS ने १५६ महत्त्वाचे वायरटेप पुरावे नष्ट केले. या टेप्स न्यायालयात उपयोगी पडू शकल्या असत्या. न्यायमूर्ती जॉन मेजर यांनी याला “चुकांची साखळी” (cascading series of errors) म्हणून संबोधले.
चौकशी आणि न्यायालयीन लढा
ही चौकशी आणि खटले जवळपास दोन दशके चालले. रेयतला १९९१ साली बॉम्ब तयार केल्याबद्दल १० वर्षांची शिक्षा झाली. तर, २०१० साली खोटी साक्ष दिल्याबद्दल त्याला नऊ वर्षांची शिक्षा झाली. खोट्या साक्षीसाठी दिलेली कॅनडातील आजवरची ही सर्वात मोठी शिक्षा आहे.
दोघे निर्दोष, त्यातील एकाचा खून
२००० साली मलिक आणि बागरी यांच्यावर ३२९ खुनांचे आरोप ठेवण्यात आले. मात्र, २००५ मध्ये पुराव्याअभावी ते निर्दोष ठरले. मलिक याचा २०२२ साली एका वेगळ्या प्रकरणात खून झाला.
पंतप्रधानांची माफी
२००६ साली न्यायमूर्ती जॉन मेजर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक चौकशी सुरू झाली. २०१० साली आलेल्या अहवालात CSIS, RCMP आणि कॅनडियन सरकारला जबाबदार धरले गेले. पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी या घटनेबद्दल अधिकृत माफी मागितली.
विस्मृतीत गेलेली घटना
एअर इंडिया फ्लाइट १८२ स्फोट इतकी मोठी दुर्घटना असूनही, कॅनडाच्या लोकांना फारशी माहीत नाही. २०२३ साली झालेल्या एका सर्वेक्षणात ९०% कॅनडियन नागरिकांनी कबूल केलं की, त्यांना या घटनेबद्दल फारच कमी माहिती आहे. विशेषतः ३५ वर्षांखालील नागरिकांपैकी निम्म्याहून अधिकांनी या घटनेचं नावही ऐकलं नव्हतं.
सरकारचे दुर्लक्ष
बऱ्याच जणांना ही घटना कॅनडाची की भारताची हेही समजत नाही. पीडितांच्या नातेवाईकांनी अनेक वेळा तक्रार केली आहे की, सरकारने या घटनेशी संबंधित स्मारकं, शिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रिया याकडे दुर्लक्ष केलं.
स्मारके आणि वारसा
या घटनेच्या स्मरणार्थ टोरांटो, व्हॅनकूव्हर, मॉन्ट्रियल, ऑटवा आणि आहाकिस्ता (आयर्लंड) येथे स्मारके उभारण्यात आली आहेत. येथे मृतांच्या नावांची नोंद असून ही स्मारके राजकीय दहशतवादी, सरकारी अपयश आणि गुप्तचर यंत्रणांच्या हलगर्जीपणाची आठवण करून देतात. The Sorrow and the Terror (भारती मुखर्जी) आणि Air India 182 (CBC डॉक्युमेंटरी) यांसारख्या पुस्तकांद्वारे या घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. कवी रेने साक्लिकार यांनी Children of Air India हे भावनिक स्मरणरूपक प्रसिद्ध केलं.
डॉ. चंद्र शंकरत्री, यांनी आपली पत्नी आणि मुले गमावली. त्यांनी भारतात संकुरत्री फाउंडेशन स्थापून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम सुरू केलं. कॅनडातील विद्यापीठांमध्ये काही शिष्यवृत्तीदेखील या घटनेच्या पीडितांच्या स्मरणार्थ दिल्या जातात.
उपसंहार
एअर इंडिया फ्लाइट १८२ ही केवळ दहशतवादाची कथा नाही. ती सरकारी यंत्रणांच्या अपयशाची, विसरलेल्या वेदनेची आणि त्याही परिस्थितीतून उभारी घेणाऱ्या कुटुंबांची कहाणी आहे.
इतिहासातील चूक पुन्हा?
या घटनेने कॅनडाच्या गुप्तचर आणि न्याय व्यवस्था किती उथळ आहेत, हे जगासमोर आणलं. आजही जगभरात राजकीय हिंसाचार वाढताना दिसतोय, खलिस्तानसारख्या विचारधारा पुन्हा डोकं वर काढताना दिसतात. अशा वेळी फ्लाइट १८२ ची शोकांतिका विसरणं म्हणजे इतिहासाची चूक पुन्हा होऊ देण्यासारखं आहे.