भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे तसेच भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी (२८ सप्टेंबर) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन कृषी क्षेत्रातील संशोधनास वाहून घेतले होते. स्वामीनाथन यांच्या जाण्याने जागतिक कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गरीबांचं कल्याण व भूकमुक्ती हा ध्यास जगलेले एम. एस. स्वामीनाथन कोण होते? त्यांना हरितक्रांतीचे जनक का म्हटले जाते? हे जाणून घेऊ या….
स्वामीनाथन आयपीएस अधिकारी होते. मात्र कृषीक्षेत्रातील संशोधनाची त्यांना जास्त आवड असल्यामुळे त्यांनी राजीनामा देत कृषी संशोधाला स्वत:ला वाहून घेतले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांत महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसचे १९८४ ते ९० या काळात ते अध्यक्ष होते. १९८९ ते ९८ या काळात ते वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (इंडिया) चे अध्यक्ष आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक होते. यासह त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जाबदाऱ्या पार पाडल्या.