कर्नाटकमधील हक्की-पिक्की या आदिवासी जमातीचे १८१ लोक सुदानमधील गृहयुद्धात अडकले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या आदिवासी समुदायातील लोकांना भारतात परत सुखरूप आणावे, अशी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी या विषयातील राजकीय मूल्य अचूक जोखले. हक्की-पिक्की ही आदिवासी जमात नेमकी कशासाठी ओळखली जाते? कर्नाटकातून आफ्रिकेमधील सुदानमध्ये या जमातीमधील लोक कशासाठी गेले होते? या विषयाचा आढावा घेणारा हा लेख.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हक्की-पिक्की कोण आहेत? या शब्दाचा अर्थ काय?

हक्की-पिक्की ही आदिवासी जमात भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये आढळते. विशेषतः ज्या भागात जंगल आहे, त्याच्या आसपास या जमातीचे लोक राहतात. हक्की पिक्की हा शब्द कन्नड भाषेतील आहे. हक्की म्हणजे ‘पक्षी’ आणि पिक्की म्हणजे ‘पकडणारा’ या अर्थाने हक्की-पिक्की म्हणजे पक्षी पकडणारे लोक. सेमी नोमॅडिक ट्राइबमध्ये या जमातीचा समावेश करण्यात आलेला आहे. पक्षी पकडणे आणि शिकार करणे, हे या जमातीचे पारंपरिक काम आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीची लोकसंख्या ११ हजार ८९२ एवढी आहे. कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते. उत्तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात या जमातीला मेल-शिकारी (Mel-Shikari) या नावाने ओळखले जाते.

चामराजनगर विद्यापीठाचे कुलगुरू आणि मानववंशशास्त्रज्ञ एम.आर. गंगाधर यांनी या जमातीवर संशोधन केलेले आहे. ते म्हणाले, हक्की-पिक्की जमातीचे लोक उपजीविकेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गटाने प्रवास करतात. त्यांची विभागणी चार कुळांत झालेली आहे. गुजरातिया (Gujaratia), पनवार (Panwar), कालिवाला (Kaliwala) आणि मेवारस (Mewaras) अशी या चार कुळांची नावे आहेत. हे चारही कुळे पारंपरिक पद्धतीने हिंदू संस्कृतीचे आचरण करतात. काही वर्षांपूर्वी या चारही कुळांमध्ये जातीची उतरंड पाहायला मिळत होती. गुजरातिया हे वरच्या श्रेणीत होते. तर मेवारस सर्वात खालच्या श्रेणीत होते. जंगल हे हक्की-पक्की यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.

हे वाचा >> सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांवरून एस जयशंकर-सिद्धरामय्या यांच्यात ट्विटर वॉर!

ही जमात मुळची कुठली?

फार पूर्वी हक्की-पिक्की यांचे मूळ निवासस्थान हे गुजरात आणि राजस्थान यांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये होते. गंगाधर यांनी दिलेल्या माहितीनुसार जगण्यासाठी त्यांनी दक्षिणेच्या दिशेने मार्गक्रमण केले. “आंध्र प्रदेश राज्यातून या जमातीने कर्नाटकमध्ये प्रवेश केला. कर्नाटकमधील या जमातीचे लोक अजूनही आंध्र प्रदेशमधील जलापल्लीला स्वतःचे प्राचीन घर समजतात. जलापल्लीमध्ये त्यांच्या पूर्वजांनी लक्षणीय काळ वास्तव्य केले होते. हक्की-पिक्की जमात आता देशभरातील विविध राज्यांत पसरली आहे,” असेही गंगाधर सांगतात.

तसेच गेल्या काही वर्षांपर्यंत जमातीमधील महिला राजस्थानी महिलांप्रमाणे घागरा परिधान करीत होत्या. यामुळे त्यांचे राजस्थानशी असलेले नाते स्पष्ट होत होते. सध्या मात्र जमातीमधील महिला साडी आणि इतर वेशभूषादेखील करतात.

हक्की-पिक्कीचा पारंपरिक व्यवसाय काय होता, सध्या ते काय करतात?

हक्की-पिक्की जमातीचा जगण्याचा संघर्ष मोठा विलक्षण असा होता. वर्षातले नऊ महिने ते भटके-विमुक्ताचे आयुष्य जगत असत आणि उरलेल्या तीन महिन्यांसाठी ते त्यांच्या मूळ निवासस्थानी परतत असत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वार्ताहरांनी हक्की-पिक्की जमातीचे निवासस्थान असलेल्या म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजापुरा या ठिकाणी भेट दिली. पूर्वी या जमातीमधील पुरुष शिकार करायचे तर महिला गावात भीक मागत असत. पण काळानुरूप वन्यजीव संरक्षण कायदे अधिक कडक झाल्यामुळे हक्की-पिक्की जमातीची शिकार बंद झाली. त्यामुळे त्यांनी मसाले विकणे, नैसर्गिक तेल आणि प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचे काम सुरू केले. गावाच्या बाजारात किंवा जत्रेच्या ठिकाणी तात्पुरती दुकाने मांडून या जमातीच्या लोकांनी लहान-मोठे व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> अन्वयार्थ : विदीर्ण, एकाकी सुदान..

कर्नाटक आदिवासी बुडाकट्टू हक्की-पिक्की जनंगा (Karnataka Adivasi Budakattu Hakki Pikki Jananga) या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पी.एस. नंजुंदा स्वामी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, १९५० च्या दरम्यान हक्की-पिक्की समुदाय जंगलातून गावात स्थलांतरित झाला. पूर्वी आम्ही प्राण्यांची शिकार करून उदरनिर्वाह करीत होतो. पण वन्यजीव कायद्यांतर्गत आमच्या जमातीमधील काही सदस्यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे आम्ही शिकारीचे काम सोडून वनौषधी वनस्पती विकणे, किरकोळ घरगुती सामान विकणे अशा प्रकारची छोटी-मोठी कामे करायला लागलो.

कालांतराने वनौषधी वनस्पती विकण्याचा व्यवसाय भारतात बंद झाला. त्यामुळे जमातीमधील लोक आता जगभरात विखुरले असून त्या त्या ठिकाणी वनौषधी वनस्पती, आयुर्वैदिक तेल विकण्याचा व्यवसाय त्यांच्याकडून केला जातो.

नंजुंदा स्वामी पुढे म्हणाले की, तामिळनाडूमधील हक्की-पिक्की जमातीचे लोक २० ते २५ वर्षांपूर्वी सिंगापूर, थायलंड आणि इतर देशांत स्थलांतरित झाले. तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये आयुर्वैदिक वनौषधींना चांगली मागणी असल्यामुळे या देशांतही हक्की-पिक्की लोक मोठ्या प्रमाणावर गेलेले आहेत. कर्नाटकातील हक्की-पिक्की जमातीनेही तामिळनाडूतील बांधवांप्रमाणेच आफ्रिकेची वाट धरली आणि त्या देशांमध्ये वनौषधी वनस्पती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मागच्या वीस वर्षांपासून कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीचे लोक आफ्रिकेत जात आहेत.

हक्की-पिक्की जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय नगण्य असे आहे. पक्षीराजापुरा येथील दोन हजार लोकसंख्या असलेल्या जमातीचा अभ्यास केला असता त्यात फक्त आठ लोक पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यात यशस्वी झाल्याचे दिसले. तर एक व्यक्ती पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले.

मातृसत्ताक परंपरा पाळणारी जमात!

कर्नाटकमधील हक्की-पिक्की हे हिंदू परंपरा जोपासत आले आहेत. येथील सर्व हिंदू सणांमध्ये ते सहभागी होतात. कुटुंबातील मोठा सदस्य आपले केस कापत नाही. जेणेकरून तो कुटुंबप्रमुख आहे, हे सर्वांना कळते. जमातीमध्ये मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा यांच्यात लग्न लावून देण्याची प्रथा पाळतात. जमातीमधील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये मुलीचे सरासरी लग्नाचे वय १८ आणि मुलाचे लग्नाचे वय २२ पर्यंत असते. हिक्की-पिक्की जमात मातृसत्ताक पद्धतीचे आचरण करते. त्यांच्या लग्नात मुलाच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा द्यावा लागतो. पक्षीराजापुरा येथे राहणाऱ्या देवराज (२८) ने सांगितले की, त्याचे लग्न लागण्यासाठी त्याने मुलीच्या घरच्यांना ५० हजारांचा हुंडा दिला होता. हक्की-पिक्की जमात एकपत्नी प्रथा पाळणारी आहे.

आफ्रिकन देशांत उदरनिर्वाह कसा करतात?

पक्षीराजापुरा येथील जमातीमधील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, आफ्रिकन देशामुळे त्यांना गरिबीतून बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग सापडला. अनिल कुमार याने सांगितले की, आफ्रिकन देशांमध्ये आमच्या वनौषधीला खूप मागणी आहे. जर जमातीमधील एखाद्याने पाच लाख रुपये गुंतवणूक करून कच्चा माल जमा केला आणि यावर प्रक्रिया करून जर तो आफ्रिकेत नेला, तर तीन ते सहा महिन्यांमध्ये पैसा दुप्पट किंवा तिप्पट होतो. यामध्ये जास्वंदाची पावडर, जास्वंदाचे तेल, आयुर्वैदिक वनौषधी आणि मसाले इत्यादी वस्तू कच्च्या मालाच्या स्वरूपात घेऊन त्या आफ्रिकेत विकल्या जातात.

अनिल कुमार पुढे सांगतो की, या वस्तूंना आता भारतीय बाजारपेठेत मागणी राहिलेली नाही. आम्ही आता ऑनलाइनही आमच्या वस्तू विकतो. तसेच फेसबुक आणि यूट्यूब यांसारख्या सोशल मीडियावरून आमच्या उत्पादनाची जाहिरात करतो.

सुदानमध्ये गृहयुद्ध का पेटले?

अरब राष्ट्रांच्या सीमेवरील आफ्रिकेतील सुदानमध्ये एका आठवड्यापासून गृहयुद्ध छेडले गेले आहे. देशावर ताबा मिळविण्यासाठी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यामध्ये हिंसाचार उसळला असून राजधानी खार्टूम येथे गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. मंगळवार रात्रीपर्यंत जवळपास २०० जणांचा बळी गेला, तर दोन हजारांच्या आसपास व्यक्ती जखमी झाल्या होत्या. मृतांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. याशिवाय कर्नाटकातील हिक्की-पिक्की जमातीचे ३० जण खार्टूममध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थिती भीषण आहे. कित्येक कुटुंबांकडे दिवसभर पुरेल इतकाही अन्न व पाणीसाठा शिल्लक नाही, अशी माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे.

आणखी वाचा >> सुदानमध्ये ‘देशांतर्गत युद्ध’ भडकण्याची कारणे काय?

सैन्यदलाचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट ग्रुप’ (आर.एस.एफ.) या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या दोघांमध्ये सुदानच्या सत्तेवरून संघर्ष पेटला आहे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudan conflict why hakki pikkis tribe of bird catchers travels to africa from karnataka kvg