आग्नेय आशियात मुसळधार पाऊस, पूर व ‘टायफून यागी’ने हाहाकार झाला आहे. लाखो लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. आशियातील या वर्षातील हे सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ असल्याचे सांगितले जात आहे. बेरील या चक्रीवादानंतर या वर्षातील जगामधले हे दुसरे सर्वांत शक्तिशाली चक्रीवादळ आहे. फिलिपिन्स, चीन, लाओस, म्यानमार व थायलंड यांसारख्या अनेक देशांवर ‘यागी’ वादळाचा गंभीर परिणाम झाला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका व्हिएतनामला बसला आहे, तिथे मृतांचा आकडा २३३ पर्यंत पोहोचला आहे. या देशांमधील एकूण मृतांची संख्या ३०० पार गेली आहे आणि अनेक लोक बेपत्ता असल्याने या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ म्हणजे काय? ते कसे तयार होते? ‘टायफून यागी’ इतके शक्तिशाली कसे झाले? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे कशी तयार होतात?

विषुववृत्ताजवळील उबदार समुद्राच्या पाण्यावर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरील उबदार, ओलसर हवा वरच्या दिशेने वाढत जाते, तेव्हा खाली हवेचा दाब कमी होतो. जास्त हवेचा दाब असलेल्या आजूबाजूच्या भागांतून हवा या कमी दाबाच्या क्षेत्रात जाते आणि नंतर ही हवादेखील उबदार व ओलसर होते. जसजशी उबदार, ओलसर हवा वाढते, तसतशी ती थंडही होते आणि हवेतील पाणी ढग आणि गडगडाटी वादळे तयार करते. समुद्राची उष्णता आणि त्याच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होणारे पाणी यांवर या वादळांची शक्ती आणि गती अवलंबून असते.

विषुववृत्ताजवळील उबदार समुद्राच्या पाण्यावर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : नोकरीचं आमिष दाखवून भारतीयांना केलं रशियन सैन्यात भरती; आतापर्यंत किती भारतीयांची सुटका?

“सर्वांत कमकुवत उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना ‘ट्रॉपिकल डिप्रेशन’, असे म्हणतात. जर या वाऱ्यांची तीव्रता वाढली आणि सतत वाहणारे वारे ताशी ३९ मैल (६३ किमी प्रतितास) वेगाने वाहू लागले, तर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ मोठ्या वादळाचे स्वरूप धारण करते,” अशी माहिती नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)कडून देण्यात आली. ११९ किलोमीटर प्रतितास आणि त्याहून अधिक वेगाने वाऱ्याचा वेग असलेल्या वादळ प्रणालींना चक्रीवादळ, टायफून किंवा उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे म्हणून वर्गीकृत केले जाते.

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाची श्रेणी त्याच्या सततच्या वाऱ्याच्या वेगाद्वारे निर्धारित केली जाते. श्रेणी १ ते श्रेणी ५ मध्ये त्याचे वर्गीकरण केले गेले आहे. श्रेणी १ मध्ये ११९ ते १५३ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणारी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे येतात. श्रेणी ५ मध्ये सर्वांत शक्तिशाली म्हणजेच २५२ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणारी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे येतात. तसेच, श्रेणी ३ पर्यंत पोहोचणारी वादळेदेखील मोठी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे मानली जातात. कारण- त्यांच्यामुळेही लक्षणीय नुकसान होऊ शकते.

वादळाचा सर्वाधिक फटका व्हिएतनामला बसला आहे, तिथे मृतांचा आकडा २३३ पर्यंत पोहोचला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

टायफून यागी हे आशियातील सर्वांत शक्तिशाली वादळ कसे ठरले?

१ सप्टेंबर रोजी पश्चिम फिलिपाइन्स समुद्रात उष्ण कटिबंधीय वादळ तयार झाले आणि तिथूनच ‘टायफून यागी’ला सुरुवात झाली. हे वादळ दुसऱ्या दिवशी फिलिपिन्समध्ये धडकले आणि कमकुवत होऊ लागले. परंतु, दक्षिण चिनी समुद्रातील असामान्यपणे उबदार पाण्यामुळे वादळ पुन्हा तीव्र झाले. ४ सप्टेंबरपर्यंत हे वादळ श्रेणी ३ मध्ये पोहोचले आणि वादळाने विनाशकारी स्वरूप धारण केले. दुसऱ्या दिवशी २६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागले आणि हे वादळ श्रेणी ५ पर्यंत पोहोचले. टायफून यागी हे दक्षिण चीन समुद्रात १९५४ मधील पामेला, २०१४ मधील राममासून व २०२१ मधील राय या वादळांनंतर श्रेणी ५ मध्ये नोंदविलेले चौथे वादळ आहे.

६ सप्टेंबर रोजी हे वादळ २२३ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह चीनच्या हैनान प्रांतात धडकले. दुसऱ्या दिवशी ‘टायफून यागी’ने उत्तर व्हिएतनाममधील क्वांग निन्ह प्रांतातील हैफॉन्गला धडक दिली. या देशाने दशकभराहून अधिक काळानंतर इतके शक्तिशाली वादळ पाहिले. वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत गेले. मात्र, तरीही गेल्या आठवड्यात म्यानमारसारख्या देशांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे नेपिडावच्या आसपास गंभीर पूरस्थिती निर्माण झाली.

१ सप्टेंबर रोजी पश्चिम फिलिपाइन्स समुद्रात उष्ण कटिबंधीय वादळ तयार झाले आणि तिथूनच ‘टायफून यागी’ला सुरुवात झाली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हवामानातील बदलाचा उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांवर होणारा परिणाम

हवामान बदलाचा उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांवर नेमका कसा परिणाम होतो यावर शास्त्रज्ञ अजूनही काही स्पष्ट सांगू शकलेले नाहीत. कारण- वादळ कसे विकसित होते, त्याची ताकद, कालावधी आणि एकूण वैशिष्ट्ये ठरविणारे बरेच घटक आहेत. परंतु, वाढत्या जागतिक तापमानामुळे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे अधिक तीव्र होत आहेत यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. उदाहरणार्थ- या वर्षी जुलैमध्ये ‘जर्नल क्लायमेट अॅण्ड ॲटमॉस्फेरिक सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, आग्नेय आशियातील उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आता किनारपट्टीच्या जवळ येत आहेत. त्यांचा वेग वाढत असून, ती अधिक तीव्र होत आहेत आणि जमिनीवरील त्यांचा कालावधीही वाढत आहे.

हेही वाचा : सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान कसं करणार?

असे प्रामुख्याने समुद्राच्या पृष्ठभागाच्या उबदार तापमानामुळे होत असावे. जागतिक सरासरी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १८५० पासून जवळपास ०.९ अंश सेल्सिअसने आणि गेल्या चार दशकांमध्ये ०.६ अंश सेल्सिअसच्या आसपास वाढले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या उच्च तापमानामुळे सागरी उष्णता वाढत आहे आणि त्यामुळे चक्रीवादळ व उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांसारखी वादळेदेखील अधिक तीव्र होऊ शकतात. उष्ण तापमान महासागरातून हवेत होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढवते. जेव्हा वादळे महासागरातून जातात, तेव्हा त्या वादळांमध्ये पाण्याची वाफ आणि उष्णता जमा होत जाते. त्यामुळेच जोरदार वारे, जोरदार पाऊस आणि वादळे जमिनीवर पोहोचल्यास पूरस्थिती निर्माण होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Typhoon yagi becoming the most powerful storm in asia rac