विनायक डिगे
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो. जगातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी १७ टक्के रुग्ण भारतात आहेत. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार भारतात १०.१३ कोटी नागरिक हे मधुमेहाने ग्रस्त तर जवळपास १३.६ कोटी नागरिक हे पूर्व मधुमेहग्रस्त असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय उच्च रक्तदाबाने आणि जवळजवळ ४० टक्के लोक हे लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. उच्च रक्तदाब व लठ्ठपणा हे दोन्ही घटक मधुमेहासाठी धोकादायक आहेत. या असंसर्गजन्य आजाराशी लढा देण्यासाठी मधुमेहाबाबत जागृती निर्माण होणे आणि त्याला प्रतिबंध करणे हे महत्त्वाचे आहे. मधुमेह (दोन्ही प्रकार १ आणि प्रकार २) आणि पूर्व मधुमेहाचे निदान करण्यासाठी त्यावरील उपचारांची दिशा ठरवण्यात म्हणजेच एचबीए१सी (HbA1C) चाचणी महत्त्वपूर्ण ठरते. या चाचणीला ग्लाइकेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन चाचणी असेदेखील म्हणतात.

मधुमेह तपासण्यासाठी एचबीए१सी चाचणी का?

क्लीव्हलँड क्लिनिक जर्नल ऑफ मेडिसिन या शोधपत्रिकेत २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, एचबीए१सी चाचणी १९५५ मध्ये नावारूपास आली. परंतु मधुमेहाच्या रुग्णांमध्ये १९६८ पर्यंत वाढलेली एचबीए१सी पातळी लक्षात घेतली गेली नाही. मधुमेहग्रस्त व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी ओळखण्यासाठी ही चाचणी उपयोगात आणण्यात आणखी आठ वर्षे लागली. क्लिनिकल वापराच्या पहिल्या काही वर्षांमध्ये एचबीए१सी च्या वापर, निष्कर्ष यांत विसंगती दिसून येत होती. मात्र एचबीए१सीच्या मोजमापांचे महत्त्व अचूक अभ्यासाद्वारे स्पष्ट झाल्याचे शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे. १९९३ ते २०१२ या कालावधीत करण्यात आलेल्या संशोधनामुळे यामध्ये अधिक अचूकता येण्यास मदत झाली. अमेरिकन डायबेटीज असोसिएशनने २००९ मध्ये तर जागतिक आरोग्य संघटनेने २०११ मध्ये एचबीए१सीचा मधुमेहासाठी निदान चाचणी म्हणून वापर करण्यास परवानगी दिली.

आणखी वाचा-विश्लेषण : ब्लड कॅन्सरवर प्रभावी ठरू शकते स्वदेशी उपचार प्रणाली? ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ काय आहे?

एचबीए१सी चाचणी कशी कार्य करते?

एखाद्या व्यक्तीने सेवन केलेल्या पदार्थांतून साखर त्याच्या रक्तात मिसळते. साखर किंवा ग्लुकोजचा त्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनशी संबंध आहे. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रथिने असून ते आपल्या शरीराच्या सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवते. अन्नातून मिळणाऱ्या साखरेचा हिमोग्लोबिनशी संबंध येत असला तरी पूर्व मधुमेह आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. रक्तातील लाल पेशींचे आयुष्य हे १२० दिवसांचे असते. त्यामुळे एचबीए१सी ही चाचणी दर तीन महिन्यांनी केली जाते. तीन महिन्यांच्या आत म्हणजेच पहिल्या चाचणीनंतर एक किंवा दोन महिन्यांमध्ये ही चाचणी केल्यास साखरेचे योग्य निदान होणे अवघड होते.

एचबीए१सी चाचणीचे परिणाम कसे दिसतात?

एचबीए१सी पातळी टक्केवारी म्हणून किंवा प्रति मोल मिलीमोल्समध्ये मोजले जातात. हे एकक रासायनिक पदार्थांसाठी वापरले जाते. टक्केवारी जितकी जास्त असेल तितकी रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्त असते. ५.७ टक्क्यांपेक्षा कमी एचबीए१सी पातळी सामान्य मानली जाते. तर ५.७ आणि ६.४ टक्क्यांदरम्यान साखरेची पातळी असल्यास ती व्यक्ती पूर्व मधुमेहग्रस्त असू शकते. ६.५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त साखरेची पातळी असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असते. मोलमध्ये याची नोंद ४२ मोल म्हणजे ६ टक्क्यांपेक्षा कमी, ४२ ते ४७ मोल म्हणजे ६ ते ६.४ टक्के आणि ४८ माेल म्हणजे ६.५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक समजले जाते. दरम्यान रुग्णाला मूत्रपिंड किंवा यकृत निकामी झाल्यास गंभीर अशक्तपणा किंवा थॅलेसेमियासारखा रक्ताचा आजार असल्यास चाचणीचे परिणाम बदलण्याची शक्यता असते. काही लोकांमध्ये सामान्य प्रकारचे हिमोग्लोबिन आढळल्यास किंवा स्टिरॉइड्स, ओपिएट्स किंवा डॅप्सोन (कुष्ठरोगावरील औषध) यासह काही औषधांचे सेवन रुग्ण करत असल्यास तसेच गर्भवती महिलांच्या हिमोग्लोबिन पातळीत बदल होऊ शकतो. एचबीए१सीची पातळी ही व्यक्तिपरत्वे बदलू शकते. वय, आरोग्य स्थिती, घेण्यात येणारी औषधे आणि अन्य घटकांवर ही पातळी अवलंबून असते.

आणखी वाचा-विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

ही चाचणी कोणाची केली जाते?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रकार २ मधुमेहावरील उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींची मधुमेह तपासणी करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा, वाढलेला कंबरेचा घेर, उच्च रक्तदाबाचा इतिहास किंवा त्यावर होत असलेले उपचार, हृदयविकाराचा इतिहास आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचा इतिहास यासह एक किंवा अधिक जोखीम घटक असलेल्या व्यक्तींमधील मधुमेहाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. साखरेची पातळी सामान्य असलेल्या व्यक्तीची दर तीन वर्षांनी चाचणी केली जाते. परंतु जर एखादी व्यक्ती प्री-डायबेटिक असेल, तर तिच्या पुन्हा चाचण्या केल्या जातात.

चाचणी किती वारंवार करावी?

दर तीन महिन्यांनी चाचणी करावी. उपवास केल्यावर किंवा जेवणानंतर रक्तातील साखरेचे मोजमाप करणाऱ्या चाचण्या एका विशिष्ट कालावधीत असलेली रक्तातील साखरेची पातळी देतात. मात्र एचबीए१सी चाचणी गेल्या दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी दर्शवते. तसेच, पारंपरिक चाचण्यांमध्ये व्यक्तीच्या जेवणातील पदार्थांवर अवलंबून चढ-उतार होऊ शकतात. त्या तुलनेत एचबीए१सी चाचणी ही अधिक विश्वासार्ह समजली जाते. कारण संबधित व्यक्तीने कधी खाल्ले आहे याची पर्वा न करता या चाचणीतून साखरेचे प्रमाण तपासता येते.

आणखी वाचा-पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?

चाचणीच्या मर्यादा काय आहेत?

एचबीए१सी चाचणी अन्य चाचण्यांची जागा घेत नाही तसेच तिची तुलना अन्य चाचण्यांबरोबर होऊ शकत नाही. मधुमेह आणि पूर्व-मधुमेहाची चाचणी करण्यासाठी पारंपरिक रक्त शर्करा चाचणी केली जाते. ही चाचणी घरी करण्यात येणाऱ्या नियमित रक्त-शर्करा चाचणीची जागा घेत नाही. कारण दिवसा किंवा रात्री रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि कमी होऊ शकते. एचबीए१सी चाचणीमध्ये याची नोंद होत नाही. मधुमेह असलेल्या नागरिकांमध्ये मधुमेहावरील दीर्घकालीन नियंत्रणाचे मूल्यांकन करण्यासाठी एचबीए१सी चाचणी ही एक सर्वोत्तम मानली जाते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे सर्व जागतिक वैद्यकीय संस्थांद्वारे निदान चाचणी म्हणून ती एकसमानपणे स्वीकारली जात नाही. तसेच भारतामध्ये थॅलेसेमिया आणि स्ट्रक्चरल हिमोग्लोबिनचे प्रकार हे तुलनेने जास्त आहे. त्यामुळे भारतामध्ये या चाचणीला मर्यादा येऊ शकतात.