कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील ‘लेसर शो’मुळे कोल्हापूर शहरात ६३ जणांच्या डोळय़ाला इजा पोहोचली आहे. या ‘लेसर शो’साठी परवानगी दिली जाऊ नये अशी सूचना असतानाही त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा हा परिणाम असल्याचा सूर आहे.

यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत वाद्याच्या भिंतींचा दणदणाट सुरू होता. दुसरीकडे काही मंडळांनी मिरवणूक आकर्षक बनण्यासाठी अति तीव्र ‘लेसर’ किरणांचा वापर केला होता. या अति तीव्र किरणांमुळे ६३ जणांच्या डोळय़ाला इजा पोहोचली आहे. यामध्ये आबालवृद्धांचा समावेश आहे.

‘लेसर’ किरणांची क्षमता दहा वॅटपेक्षा अधिक असू नये, एकाच ठिकाणी ‘लेसर’ केंद्रित करू नये, डोळे तसेच नाजूक त्वचा यास इजा पोहोचू नये अशा प्रकारे लेसर किरणांचा वापर करण्याच्या कंपन्यांच्या सूचना आहेत. हा आरोग्यसाठीच्या खबरदारीचा नियम आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक मंडळांनी पाठ फिरवली. तर प्रशासनानेही डोळेझाक केली.

२०१८ सालच्या विसर्जन मिरवणुकीत राजारामपुरी भागात काही मंडळांनी लेसर शोचे आयोजन केले होते. त्याही वेळी अनेकांना डोळय़ाला इजा पोहचली होती. यावर्षी देखील गणरायाचे आगमन मिरवणुकीवेळी लेसर शोमध्ये डोळय़ांना इजा, मोबाईल खराब होणे असे प्रकार घडले होते. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीवेळी लेसर शोला परवानगी दिली जाऊ नये, अशा सूचना अनेकांनी पोलीस, प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र याबाबत पुरेशी दक्षता घेतली गेल्याचे दिसत नाही. दरम्यान, वाद्याच्या िभती आणि ‘लेसर शो’ मुळे इजा पोहोचलेल्या मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेबाबत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. माधवी मेहेंदळे म्हणाल्या, की ‘लेसर लाईट’चे दोन तीन प्रकार आहेत. किती तीव्रतेचे ‘लेसर’ डोळय़ांसाठी सुरक्षित आहेत, याची माहिती आणि त्याप्रमाणे ‘लेसर’ लाईट वापरासाठी नियमावली असणे आवश्यक आहे. काही प्रकारचे लाईट डोळय़ांना वरवरची इजा करतात तर काही वेळा ही इजा खोलवर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तीव्र प्रकाशाकडे आपण फार वेळ सलग बघू शकत नाही, आपले डोळे आपोआप मिटतात. डोळय़ांसाठी हे एक प्रकारचे सुरक्षाकवच आहे. सूर्यग्रहणही कोणत्याही सुरक्षित चष्म्याशिवाय पाहिल्याने डोळय़ांमध्ये व्रण येतो. त्यामुळे कमी दिसण्याची तक्रार घेऊन रुग्ण येतात. ‘लेसर लाईट’च्या बाबतही असे होण्याचा धोका असतो. त्यामुळे या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आणि ते वापरण्याबाबत कठोर नियमावली या दोन्हींची गरज असल्याचे डॉ. मेहेंदळे यांनी स्पष्ट केले.