मराठी चित्रपट व नाटय़ सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले यांचे सोमवारी सकाळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या कलाजीवनात त्यांनी ७०० हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील सृजनशील शिक्षक तसेच ध्येयवेडा दिग्दर्शक हरपला आहे, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये भोसले हे सहायक म्हणून रुजू झाले. नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांच्या सूचनेनुसार ते रंगभूमीकडे वळले, आणि या क्षेत्रातील सनिक बनून रंगभूमीची अखंडपणे प्रदीर्घ सेवा केली. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलावंताचे जीवन व कलाजीवन घडविण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. या व्यवसायातून पसे मिळविणे यापेक्षा चित्रपट व नाटय़ क्षेत्रासाठी नवोदित कलाकारांमधून कसदार अभिनयाचे कलावंत घडविणे याचा त्यांनी ध्यास घेतला.

वाय.जी.भोसले यांनी ‘स्वप्नगंधा थिएटर’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कांदबरीवर ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून ते स्वीकारत असत.

चित्रपट व व्यावसायिक नाटय़सृष्टीला अनेक कलावंत देण्यात वाय.जी.भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, विलास रकटे, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामिनी भाटिया, संध्या रायकर, लीला गांधी, शांता तांबे आदी कलावंतांनी नाटय़ कलेचे धडे घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. विश्वास पाटील (पानीपतकार), विलास पाटील यांनीही भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कलेचे धडे घेतले.

स्व.राज कपूर यांचा शहरात पुतळा उभा करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भोसले यांचा अनेक वेळा सन्मान झाला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मराठी चित्रपट निर्मिती अमृत महोत्सव सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. गायन समाज देवल क्लब तर्फे केशवराव भोसले जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. चित्रतपस्वी व्ही.शातांराम यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष गौरव, कलाजंली संस्थेतर्फे नाटय़ कलायोगी पुरस्कार, संस्कार भारती तर्फे करवीर भूषण पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमाप अभिवादन समितीतर्फे स्मृतिगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.