२००९ साली श्रीलंकन संघावर लाहोर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आयसीसीने क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. त्यानंतर तब्बल ८ वर्ष पाकिस्तानात आयसीसीची एकही स्पर्धा खेळवली गेली नव्हती, यावेळी पाकिस्तानने दुबईच्या मैदानावर आपले सामने खेळले. मात्र ८ वर्षानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानात क्रिकेट खेळलं जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान विरुद्ध ‘वर्ल्ड ११’ संघांमध्ये १० सप्टेंबरपासून लाहोर येथे ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जावी यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना खास आपल्या निरोप समारंभात जेवणाचं आमंत्रणही दिलं होतं. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली कंबर कसलेली आहे. दोन्ही संघांसाठी पाकिस्तान सरकारने राष्ट्रपती दर्जाची सुरक्षाव्यवस्था उभी केली आहे.

अवश्य वाचा – क्रिकेटसाठी पाकची डिनर डिप्लोमसी, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहरांना जेवणाचं निमंत्रण

या मालिकेला आपली परवानगी देण्याआधी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. यात समाधानकारक बदल दिसल्यानंतरच आयसीसीने या मालिकेला आपली परवानगी दिली आहे. श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात क्रिकेट पूर्णपणे बंद झालं होतं. २०१५ साली झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता, मात्र यावेळी लाहोरच्या गदाफी स्टेडियमपासून ८०० मिटर अंतरावर स्फोट झाला होता, ज्यात २ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या महत्वाच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय तयारी करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket will resume in pakistan after 8 years as icc approves world xi tour in pakistan