Gautam Gambhir on Shreyas Iyer Test Snub: आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आर. अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे संघात अनेक मोठे बदल दिसून आले. निवडकर्त्यांनी शुभमन गिलला कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवले तर ऋषभ पंत उपकर्णधार असेल. दरम्यान श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान न दिल्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
भारताच्या कसोटी संघात काही नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संघात संधी मिळाली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करणारे करुण नायर आणि शार्दुल ठाकूर यांनीही पुनरागमन केले आहे. पण श्रेयस अय्यरची या संघात निवड झाली नाही, त्यामुळे बराच गोंधळ उडाला आहे. आता अय्यरबद्दल कोच गंभीरला प्रश्न विचारण्यात आला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील अय्यरच्या शानदार कामगिरीनंतर, तो कसोटी संघात परतेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण तसं झालं नाही, ज्यामुळे चाहते नाराज झाले. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला या प्रश्नाचे उत्तर देण्यात रस नसल्याचे दिसून आले.
श्रेयस अय्यरला कसोटी संघात का स्थान दिले नाही, याबाबत प्रश्न विचारताच त्याने ४ शब्दात उत्तर दिलं आहे. गंभीर म्हणाला, मी निवडकर्ता नाही. यानंतर लगेचच, त्यांनी बीसीसीआयच्या वतीने ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी देशाच्या सशस्त्र दलांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. दरम्यान गंभीरने अय्यरची निवड न करण्याचे कोणतेही कारण दिले नाही.
सहसा मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार देखील संघ निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण गंभीरने कोणाचेही नाव न घेता संपूर्ण दोष निवड समिती आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकरांवर टाकला. इंग्लंड दौऱ्यासाठी अय्यरला संघात स्थान न देण्याच्या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दिले होते.
मुंबईत कसोटी संघाच्या घोषणेनंतर माध्यमांशी बोलताना आगरकर म्हणाले, “श्रेयसने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली, देशांतर्गत सामन्यांमध्येही तो चांगला खेळला आहे, पण सध्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी जागा बनत नाही.”
गेल्या रणजी ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली होती. गेल्या हंगामात त्याने ५ सामन्यांमध्ये ६८.५७ च्या सरासरीने ४८० धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश होता. यादरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अय्यरने शॉर्ट बॉलविरुद्धच्या त्याच्या कमकुवतपणावर मात केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल दरम्यान त्याने शॉर्ट बॉल खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.