जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे. अनेक सामाजिक संस्था, सेलिब्रेटी, क्रिकेटपटू यांनी आपापल्या परीने या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक व इतर मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे. मात्र काही सेलिब्रेटींना सोशल मीडियावर नेटीझन्सच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झालाही पुलवामा हल्ल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या घटनेनंतर सानियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक संदेश लिहीत ट्रोलर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही. तुमच्या मनातला राग बाहेर काढण्यासाठी आम्हाला प्रत्येकवेळा टीकेचं लक्ष्य का केलं जातं? मला पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज लागत नाही, सर्व जनतेप्रमाणे आम्हीही दहशतवादाविरोधात आहेत, अशा आशयाचा संदेश देत सानिया मिर्झाने आपलं म्हणणं सोशल मीडियावर मांडलं आहे.