चेन्नई : आगामी ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल तीन स्थानांची नामी संधी आहे, असे मत महिला ‘अ’ संघाचा प्रशिक्षक श्याम सुंदरने व्यक्त केले. यजमान या नात्याने भारताला या स्पर्धेतील महिला विभागात दोन, तर खुल्या विभागात तीन संघ खेळवता येणार आहे. भारताच्या महिला ‘अ’ संघाला अव्वल मानांकन लाभले असून या संघात कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, आर. वैशाली, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांचा समावेश आहे. ग्रँडमास्टर श्याम सुंदर या संघाला मार्गदर्शन करणार आहे. तसेच अन्य संघांतही नामांकित खेळाडूंचा समावेश आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘भारताच्या बहुतांश खेळाडूंच्या गाठीशी खूप अनुभव आहे. हे खेळाडू प्रदीर्घ काळापासून सर्वोच्च स्तरावर बुद्धिबळ खेळत आहेत. त्यामुळे ऑलिम्पियाडमध्ये भारताला अव्वल तीन स्थानांची नामी संधी आहे. आमच्या संघांनी कसून सराव केलेला आहे,’’ असे श्याम सुंदर म्हणाला. तसेच रशिया आणि चीन या बलाढय़ संघांनी यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये सहभाग न नोंदवणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल, असेही श्याम सुंदरला वाटते. ‘‘दोन बलाढय़ संघांच्या माघारीमुळे दोन्ही विभागांत आपली जेतेपदाची शक्यता वाढली आहे,’’ असे श्याम सुंदरने सांगितले. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India chance chess olympiad opinion shyam sundar coach women team ysh