बांगलादेशविरोधातील मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर शिखर धवन धडाकेबाज कामगिरी करेल अशी क्रिकेट चाहत्यांना आशा होती. पण शिखर धवन तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे ७, ८ आणि ३ इतक्याच धावा करु शकल्या. भारताने ही मालिका १-२ ने गमावली. दुसरीकडे रोहित शर्माला दुखापत झाल्याने संघात स्थान मिळालेल्या इशान किशनने द्विशतक ठोकलं. यादरम्यान बांगलादेश दौऱ्यात संघात स्थान न मिळालेल्या दिनेश कार्तिकने शिखऱ धनवच्या भविष्यासंबंधी मोठं भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किशन, शुभमन गिल यांच्यासारख्या तरुण खेळाडूंची कामगिरी पाहता शिखऱ धवनच्या वन-डेमधील एका चांगल्या कारकिर्दीचा हा वाईट शेवट असू शकतो असं म्हटलं आहे.

धवनच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह; किशनच्या दमदार कामगिरीनंतर अनुभवी सलामीवीरावर दडपण

“श्रीलंका दौऱ्यात शिखर धवनचं स्थान काय असेल? इशान किशनला संघाबाहेर कसं ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शुभमन गिलही चांगला खेळत आहे. जर रोहित शर्मा उपलब्ध असेल तर कोणाला तरी विश्रांती द्यावी लागेल. तो खेळाडू धवन असू शकतो. त्याच्या दिव्य कारकिर्दीचा हा अखेर असू शकतो. पण निवडकर्त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे,” असं दिनेश कार्तिकने Cricbuzz शी बोलताना सांगितलं.

२०२३ रोजी भारतात विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून यावेळी धवनला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल असं कार्तिकने म्हटलं आहे.

“जर शुभमन गिल संघाचा भाग असता तर कदाचित तो सलामीला उतरला असता. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. इशान किशनला संधी मिळाली असता त्याने दोन्ही हातांनी घेतली आणि सोनं केलं. यामुळे शिखर धवन अडचणीत येईल,” असं कार्तिकने सांगितलं आहे.

शिखऱ धवन सध्या भारतीय संघाच्या फक्त वन-डे संघाचा भाग आहे. टी-२० आणि कसोटीमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली आहे. वन-डे मध्ये त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्वही केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer dinesh kartik on says shikhar dhawans odi career could end sgy