Harsha Bhogle Reaction: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. पण, या सामन्यात लखनऊचा गोलंदाज दिग्वेश राठी चर्चेत राहिला. नेहमी आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत राहणारा, दिग्वेश राठी यावेळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. दिग्वेश राठीने गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्राईकला असलेल्या जितेश शर्माला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऋषभ पंतने अपील मागे घेतल्यामुळे तो नाबाद राहिला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ही संपूर्ण घटना दुसऱ्या डावातील १७ व्या षटकात घडली. त्यावेळी दिग्वेश राठी गोलंदाजी करत होता. तर जितेश शर्मा नॉन स्ट्राईकवर होता. दिग्वेश राठीने चेंडू टाकण्याआधीच जितेश शर्माने क्रिझच्या पुढे निघाला होता. त्यामुळे दिग्वेश राठीने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. पण त्याआधीच ऋषभ पंतने अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जितेश शर्मा नाबाद राहिला. त्यानंतर जितेश शर्माने ऋषभ पंतला मिठीही मारली.
काय म्हणाले हर्षा भोगले?
हर्षा भोगले यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “जर नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज क्रिझमध्ये असेल आणि गोलंदाजाने आपली अॅक्शन पूर्ण केली असेल तर पंचांनी आपला निर्णय मागे घ्यायला काहीच हरकत नाही. पण ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट”चा उल्लेख केल्यास मला वाईट वाटतं. आपण नियमानुसार खेळतो.”
जितेश शर्मा नाबाद राहिला आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हर्षा भोगले यांच्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२८ धावा करायच्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना जितेश शर्मा शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ३३ चेंडूंचा सामना नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याला साथ देत मयांक अगरवालने नाबाद ४१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.