भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला भारतीय संघाच्या पुढील कसोटी कर्णधारपदासाठी दावेदार मानले आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त राहिल्यास तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करू शकतो, असे शास्त्री म्हणाले. शास्त्री सध्या सुरू असलेल्या लेजेंड्स क्रिकेट लीगचे कमिश्नर आहेत. शास्त्री म्हणाले, ''जर रोहित फिट असेल तर तो कसोटीतही कर्णधार का होऊ शकत नाही. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, पण दुखापतीमुळे तो तेथे होऊ शकला नाही. त्याला उपकर्णधार बनवले होते तर त्याला कर्णधारपदी बढती का दिली जाऊ शकत नाही?'' हेही वाचा - VIDEO : आधी वॉर्नर, आता रैना..! ‘पुष्पा’तील ‘Srivalli’ गाण्यावर केला डान्स; अल्लू अर्जुन म्हणाला… ''रोहितच्या जागी उपकर्णधार पाहावा लागेल, ती व्यक्ती कोण असू शकते हे राहुल द्रविडला पाहावे लागेल कारण तो खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चित असणे आवश्यक आहे. या दौऱ्यात सर्वात अनुभवी खेळाडू कोण आहे, कोण चांगला खेळतोय हे ठरवा. तुम्ही तुमच्या उपकर्णधाराची आधीच घोषणा करता आणि नंतर तुम्हाला कळते की तुमचा उपकर्णधार तुमच्या इलेव्हनमध्ये बसत नाही'', असेही शास्त्रींनी म्हटले. रोहितकडे भारताच्या टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण दुखापतीमुळे तो जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले.