‘सोशल मीडिया’ आणि मुलं हा विषय सध्या सगळ्याच घरांमध्ये चर्चिला जातोय. त्यातून निर्माण होणारे, झालेले प्रश्न, मुलांचा वाढलेला ‘स्क्रीन टाइम’ तिथून पुढे विविध अडचणी अशी ही मालिकाच गुंफली जाते. प्रत्येक घरातील माणसं, त्यांचे स्वभाव – सवयी यांतून घर आकार घेत असतं. प्रत्येक घराला एक शिस्त असते; असावी. ती शिस्त केवळ मुलांसाठी नाही तर प्रथम मोठ्यांना असावी. मोठे काय सांगतात याहीपेक्षा ते कसे वागतात हे घरातील मुलं अधिक बघत असतात. त्यात आता फेसबुक, इंस्टाग्राम, यू-ट्यूब सारख्या समाजमाध्यमांनी प्रत्येक घरात आपलं ‘स्थान’ निर्माण केलं आहे. त्यांना आपल्या घरात, कुटुंबात, ओघाने आपल्या नात्यांमध्ये किती वेळ आणि किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आणि ते कृतीतही आणायचं आहे; आणि मला वाटतं, हे धनुष्य कुणाचं किती जड आहे ते कितपत पेलायचं आहे, ही कसोटी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनानंतरच्या टाळेबंदीमध्ये आमच्या घरात ‘स्क्रीन टाइम’ हा शब्द आम्ही प्रथम वापरात आणला. तेव्हा माझा मोठा मुलगा स्मितकबीर दहा वर्षांचा होता आणि धाकटा मीरअमीर दीड वर्षाचा. मुलांना बाहेर पडणं, खेळणं, माणसांना, मित्रांना भेटणं पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे रोज ३० मिनिटं त्यांना लहान मुलांचे चित्रपट, (जे मुळातच कमी आहेत.) त्यातला थोडा भाग आम्ही आयपॅडवर लावून देत असू. कारण गेली सतरा वर्षं आमच्याकडे टी. व्ही. नाही. घेतलाच नाही आणि घ्यावासा वाटलाही नाही. (या ३० मिनिटांत मियाझाकींचे चित्रपट, चार्ली चाप्लीनचे चित्रपट आणि स्वामीचे काही भाग.)

आमची दोन्ही मुलं होमस्कूलर आहेत. त्यांना अभ्यासाचं, विषय निवडीचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पहिल्या मुलाच्या जन्माआधीच ‘भावी पालक’ म्हणून आपण आपल्या सवयींमध्ये काय बदल करायचे याचा विचार मी आणि चेतन आम्ही दोघांनी केला होता. ‘मूल जेवत नाही’ ही अडचण आम्हाला आली नाही. ‘ती आम्हाला बोलू देत नाहीत’ हा प्रश्नही आला नाही, त्यामुळे ‘हातात फोन द्या’ आणि त्यावर अखंड ‘कार्टून’ लावून त्यांना घास भरवा, हवं त्या विषयावर बोला हे करावं लागलं नाही.

आणखी वाचा-चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

लहान असल्यापासूनच त्यांना गोष्टी सांगणं, वाचून दाखवणं हा दिवसातला खूप मोठा कार्यक्रम असे. त्यात गोष्टी रचणं होऊ लागलं. इथेही टी.व्ही.वर किंवा मोबाइलवर काही लावून देणं, आम्ही नेहमीच टाळलं. त्यामुळे दोघांनाही मोबाइल बघत जेवणं हे कधी झालंच नाही. सवय इथूनच लागते. म्हणून मोठं झाल्यावर आत्ता मुलांचं हे ‘स्क्रीन टाइम’ कसं कमी करायचं?’ हा प्रश्न आम्हाला पडला नाही. यात शाळेत जाणाऱ्या मुलांची अडचण म्हणजे त्यांचा अभ्यासच ‘व्हॉट्स अॅप’वर येतो. पण यातूनही मार्ग काढता येतातच.

मुलांचा अधिक वेळ घरात जातो. त्यामुळे आधी आम्ही दोघं त्यांच्या दिवसांचं नियोजन करायचो, आता स्मित स्वत: अनेक गोष्टी करतो. त्यामुळे नियोजनाची जबाबदारीही त्याची तोच घेतो. मुलांना भटकायला नेणं आम्ही करतो. ‘फिरायला’ नाही. ‘भटकणं’ म्हणजे शहरातल्या जुन्या गल्ल्या, त्यात दिसणाऱ्या जुन्या इमारती, दुकानं, त्यांच्या नावाच्या पाट्या, त्यांचे दरवाजे, रंग हे दाखवणं, त्यावर गप्पा मारणं, हे आम्हाला चौघांनाही आवडतं. किमान दीड तास चालणं हा आमचा दिनक्रम- त्यात विशेष माणसांना बघणं, त्यांच्या लकबी पाहणं आणि मग तिथेच एखादं स्केच करणं हे सहज होतं. चेतन, माझा नवरा इंटीरिअर डिझायनर आहे, त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे आणि मी इलस्ट्रेटर – लेखक म्हणून विशेष लहान मुलांच्या पुस्तकांसाठी काम करते. साहजिकच ‘कला’ हा आमच्या जगण्यातला खूप मोठा भाग आहे. आमचं कामाचं स्वरूप आणि मुलांचं होमस्कूलिंग, यात हे भटकणं म्हणजे हा ऊर्जास्राोत आहे. आम्ही दोघं फार सोशल मीडियावर सतत स्क्रोलिंग करणाऱ्या जीवांपैकी नाही. कामाचं ‘इंस्टाग्राम’वर पोस्ट केलं जातं, पण म्हणून तासनतास रिल्स पाहणं हे कधीही केलेलं नाही. लाकूडकाम, चित्रं तयार होतानाचा एखादा व्हिडीओ, मातीत केलेलं काम हे मी पाहताना, मुलांनाही दाखवते. पण म्हणून त्याची पारायणं आम्ही केलेली नाहीत. शाळेत नसल्यामुळे स्मितला अजून स्मार्टफोन दिलेला नाही. मागच्या महिन्यात त्याला कॉल घेता आणि करता येतील एवढ्याकरिता नोकिआचा एक साधा फोन घेतला. याचं कारणही तो एकटा बाहेर फिरतो, टेनिसला जातो तर त्याच्याशी संपर्क करता यावा म्हणून.

त्याला अगदीच सोशल मीडियापासून दूर ठेवलेलं नाही. कोणतंही टोक घातकच. त्याचं इन्स्टा अकाऊंट आहे, पण ते माझ्या फोनवर, ते दिवसातून दोनदा त्याला पाहता येतं. हाच नियम मी आणि चेतननेही स्वत:ला घालून दिलेला आहे. याशिवाय आम्ही घरात बैठकीच्या खोलीत ‘फोन पार्किंग’ केलेलं आहे. गरजेपुरते बोलून झालं की, आमचे फोन एका ट्रेमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्येक क्षणी सोबत वावरणारा ‘अवयव’ म्हणून अजून तरी फोनला ‘बढती’ मिळालेली नाही.

आणखी वाचा-दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

मुलं लहान असल्यापासूनच त्यांच्या सोबत विविध विषयांवर गप्पा मारणं, आमच्या लहान वयातल्या आठवणी, आमचे शेजारी, त्यांची स्वयंपाक घरं, पदार्थ, आमचे खेळ ह्यांच्या गोष्टी सांगणं, त्यांच्यासोबत खेळणं, हे आजही सुरू आहे. एकत्र स्वयंपाक करणं, मोठ्याने वाचन करणं हे करताना फार आनंद मिळतो. घरात वाचन आणि चित्रांची भरपूर पुस्तकं आहेत. त्यामुळे ‘एकत्र वाचन वेळ’ असते. त्यात वाचन झाल्यानंतर त्यावर चर्चा करणं आलंच. काहीही न करता फक्त बसून राहणं ही वेळसुद्धा आनंददायी असते.

मीर सहा वर्षांचा आहे, त्याच्या सोबत शब्दांच्या रंगांच्या अॅक्टिव्हिटी घेणं,चित्रांची पुस्तकं बघणं, त्यातून चित्रवाचन करणं हे सतत सुरू असतं. माझे आजोबा कराचीचे होते. भारतात आले तेव्हा ते एकोणीस वर्षांचे होते. त्यांच्या ‘कराचीतल्या गोष्टी’ ही खूप मोठी ठेव माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी त्यांनी दिलेली आहे. त्यातूनच मग जुने फोटो आल्बम पाहणं, त्यातल्या काळाचा संदर्भ लावणं आणि प्रवास करताना हे तुकडे पुन्हा कुठे सापडतात का? हे शोधत राहणं कायम सुरू असतं.

‘रस्ता सहल’ किंवा ‘रस्ता वाचन’ (रोडट्रिप) करताना भेटलेली माणसं, गूगलवर मॅप न लावता माणसांना विचारत केलेले प्रवास, रस्त्यात उतरून पाहिलेली शेतं, त्यातले शेतकरी, त्यांच्या सोबत बोलणं, टपरीवर प्यायलेला चहा, प्रवासात भेटलेली झाडं, त्याची पानं, बुंधे, त्यांचं पोत बघणं आणि ते शब्दात, चित्रात उतरवणं हे माझ्यासोबत मुलंही करतात. केवळ मोठेच प्रवास नाही, तर अगदी वाणसामानाचं दुकान ते भाजीमंडईत जाणं, हे सगळं त्यांनी जाणून घ्यावं त्याचा अनुभव त्यांनी स्वत: घ्यावा, आणि माणूस म्हणून मोठं व्हावं, ही पालक म्हणून आमची अपेक्षा.

हे सगळं करताना मग ‘सोशल मीडिया’साठी फार वेळ राहत नाही. मीर तर अजून लहानच आहे, पण स्मित चौदा वर्षांचा आहे. कोणतीही शिस्तं, नियम काटेरी होऊ नयेत याचं भान आहे. पण म्हणून स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक त्यांना सांगावाच लागतो… आणि मुलांसोबत संवादाचं सातत्य असेल तर आपण नेमकं त्यांना काय सांगू पाहतोय हे त्यांना समजतं, हा माझा अनुभव आहे.

आणखी वाचा-पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!

‘सुजाण पालक’ आम्हाला व्हायचं नव्हतं. कारण पालकही माणसंच आहेत आणि तेही चुकणार, आम्ही चुकतो. जर आपल्याला चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे तर तेच मुलांनाही असायला हवं. आणि मुलांनी चूक कबूल करावी असं वाटत असेल तर, आपल्यालाही माफी मागता यायला हवी.

‘सोशल मीडिया’च्या बाबतीत अगदी असंच आहे. अनेक लहान क्षण, लहान कृती आनंद देतात, हे मुलांना सांगताना आपण त्यांना वेळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा मीडिया जीवनाचा भाग होणारच आहे पण त्याला किती वेळ द्यावा, त्याच्या किती आहारी जावं हे आपल्या कृतीतून समोर मांडणं मला आवश्यक वाटतं. एखाद्या गुहेत आत आत गेल्यावर अंधारच असणार आणि तो अधिक गडद होणार, तेव्हा त्या अंधाराला दोष देत राहायचं की आपण प्रकाशाचा दिवा लावायचा हा विचार आपण करायला हवा, मला तो दिवा लावण्यातच आशा दिसते… तुम्हाला?

shubhachetan@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What and how much do your children watch on social media mrj