पुरोगामी महाराष्ट्रात दलित कुटुंबाची हत्या होणे हा संपूर्ण मानवजातीला कलंक असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील संजय जाधव त्यांची पत्नी व मुलगा या तिघा दलितांची निर्घृण हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे करून विहिरीत टाकण्याचे अत्यंत निंदनीय कृत्य मारेक-यांनी केले. अशा प्रकारे दलितांच्या हत्या वारंवार होणे पुरोगामी महाराष्ट्रात मानवजातीला कलंक आहे. या घटनेचा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे हजारे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
या प्रकरणामध्ये दोषी असणा-यांवर कठारे कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगर जिल्ह्य़ात दलितांवर वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले का होतात, याचाही शोध घेणे आवश्यक वाटते. यापुढे अशा प्रकारे दलितांवर होणारे हल्ले, हत्या थांबविण्यासाठी व्यापक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही जातिपातीचा भेदभाव न करणारी शिकवण देणारी संतांची पावन भूमी आहे. संतांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून स्पृश्य, अस्पृश्य भेदविरहित समाजनिर्मितीच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे. पुढील काळात ती जबाबदारी पार पाडण्याचे काम आम्हा सर्वांना करण्याची गरज आहे. या प्रकरणी कसून चौकशी व्हावी आणि दोषी असणा-यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी हजारे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit massacre is stigma to humanity hazare