रत्नागिरी – राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या धोरणात्मक निर्णयामूळे रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात मोठी वाढ झाल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०२३-२४ मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान ६७९०७ मेट्रिक टन इतके होते. त्यात भर पडून सन २०२४-२५ मध्ये ३३९६ मे. टनने वाढ झाली आहे. जिल्ह्याचे मत्स्योत्पादन आता ७१३०३ मे. टन एवढे झाले असल्याचे तावडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र घालण्यात आलेल्या गस्तीमुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ७१३०३ मे. टन एवढे झाले आहे. ड्रोन यंत्रप्रणालीव्दारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण ३६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ८२ नौकांवरील गुन्हे निकाली काढण्यात येवून या नौकांवर ३१ लाख १९ हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचे आयुक्त तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा (अध्यादेश), २०२१ अन्वये सन २०२४-२५ ते आजतागायत एकूण २९ एल. ई. डी. नौकांवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यापैकी १८ गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ९० लाख ४० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी करताना आढळून आल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मत्स्य विभागाकडे डीझेल प्रतिपर्ती योजने अंतर्गत सन २०२५-२६ करीता २६ मच्छीमार सहकारी संस्थाच्या १.१२३ नौकांना ३०.७७५.५० कि.ली. एवढा डीझेल कोटा मंजूर झाला आहे. गत ५ वर्षात यांत्रिक नौकाधारकांना एकूण १५२.७४६९ कोटी रु. एवढी भरीव परतावा रक्कम नौकाधारकांना अदा करण्यात आली असल्याचे तावडे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे मुख्य उद्दिष्ट मत्स्योत्पादनात वाढ हे असून जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पांमधून अपेक्षित २०० ते २५० मे. टन एवढे मत्स्योत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये ५० नोंदणीकृत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी प्रकल्प असून त्यामधून ३२७ मे. टन एवढे उत्पादन मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ४१ पाटबंधारे /जलसंधारण तलाव मासेमारी करीता मत्स्यव्यवसाय विभागाकडे असून त्यामध्ये २०२४-२५ अखेर ६४०.७ मे. टन उत्पादन मिळाले. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्येही सद्यस्थितीत संवर्धक केंद्रित होत असून भविष्यामध्ये मत्स्योत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी मत्स्य विभाग कार्यरत राहणार असल्याचे तसेच हर्णे, साखरीनाटे आणि मिरकरवाडा बंदरे विकसित करण्यास सुरुवात झाल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले.