संगमनेर : तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मासिक सभा, ग्रामसभांमधील अनियमिततेसह १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या खरेदीतील गैरव्यवहारांबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान गैरव्यवहाराचे आरोप झालेले आजी-माजी सरपंच हे नात्याने पती-पत्नी असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे समर्थक आहेत. दुसरीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुंजाळवाडीच्या सरपंचावर कारवाईची मागणी केली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी म्हटले आहे की, सन २०२२-२३ या वर्षात तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे ८.५३ लाखांचा अपहार केला आहे. यात बाकडे खरेदी, मेडीक्लोर औषध खरेदीसाठी आणि औषध फवारणी व इतर औषध खरेदीसाठी बोगस बिलांचा समावेश आहे. तसेच, २०२४-२५ या आर्थिक वर्षात (१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून) विद्यमान सरपंच प्रीती गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे.
यामध्ये महिला सबलीकरणाच्या नावाखाली ४ लाख १२ हजार ५६० च्या शिलाई मशीन खरेदी आणि २,९९,००० रुपयांच्या कचराकुंडी खरेदीतील गैरव्यवहारांचा समावेश आहे. ‘नल-जलमित्र’ योजनेतही अनियमितता झाल्याचा आरोप आहे, जिथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर सुमारे ५० हजार रुपये वळवण्यात आले. ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार करूनही चौकशी झाली नसल्याचे व राजकीय दबावामुळे दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सात दिवसांत गैरव्यवहाराची चौकशी करावी अन्यथा जोर्वे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ करतील असा इशारा दिला आहे.
उपसरपंच बादशाह बोरकर, सदस्य दिगंबर इंगळे, किसन खैरे, हौशिराम दिघे, संदीप काकड, संगीता थोरात, सुनीता दिघे, पुनम खैरे, मंगल काकड, जगन्नाथ दिघे, मुकेश काकड, बाबासाहेब बोरकर, सोपान कांदळकर, संजय थोरात, शेख हमीद, वसंत विठ्ठल काकड, दत्तू नाना काकड, वसंत बोरकर, राहुल बोरकर आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील
जोर्वे हे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जन्मगाव आहे. या गावातल्या सहकारी संस्थेपासूनच थोरात यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. हे गाव संगमनेर तालुक्यात असले तरी विधानसभेसाठी मात्र मंत्री विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात आहे. गावची ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांवर प्रदीर्घ काळापासून थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र सध्या ग्रामपंचायतमध्ये मंत्री विखे समर्थक सरपंच, थोरात समर्थक उपसरपंच आहेत. त्यामुळेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेल्या गावात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून राजकीय वादविवाद होत असतात. दोन-चार दिवसांपूर्वी झालेल्या गावच्या ग्रामसभेत गैरव्यवहाराच्या कारणावरून चांगलाच राडा झाल्याची माहिती मिळाली.
महायुतीची तक्रार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासनाच्या निर्देशांनुसार गुंजाळवाडी गावात उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान न करता त्यांचा अवमान करत केवळ औपचारिकता म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन करून घेत कार्यक्रम उरकल्याचा आरोप गुंजाळवाडी येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. सरपंच अमोल गुंजाळ यांच्यावर कारवाईची मागणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.