ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेले वाद आता मिटले आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची घोषणा लगेचच केली जाण्याची शक्यता असून नवा पालघर जिल्हा १ मेपासून अस्तित्वात येईल, असे संकेत उच्चपदस्थांकडून देण्यात आले.
ठाणे जिल्हयाचे विभाजान करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. त्याची दखल घेत आदिवासी भागासाठी स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. येत्या २६ जानेवारीला नव्या जिल्हयाची घोषणा होण्याची शक्यता असून प्रत्यक्षात कामकाज मात्र मेमध्ये सुरू होईल.
ठाणे जिल्हयात २४ आमदार असतानाही काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. ग्रामीण भागातील काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी व आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना ताकद देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनास हिरवा कंदील दाखविला आहे.मात्र जिल्हयासाठी पायाभूत सुविधा व आवश्यक साधने निर्माण करण्यासाठी ५०० ते ६०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.  यासाठी मार्चमध्ये अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद केली जाईल आणि १ मेपासून नव्या जिल्हयाचा कारभार सुरू होईल असेही सांगण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seperation of thane district on 1st may