तब्बल २२ वर्षांनी कोकणातील चिपळूण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये विविध विषयांवरील सात परिसंवाद, निमंत्रितांची दोन कविसंमेलने, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि हास्यकवी अशोक नायगावकर यांच्यातील गप्पा, कौशल इनामदार आणि कमलेश भडकमकर यांचा सहभाग असलेला ‘अमृताचा वसा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अशा वाङ्मयीन कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे.
चिपळूणच्या यशवंतराव चव्हाण नगरी येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (११ जानेवारी) दुपारी साडेतीन वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करणार आहेत. स्वागताध्यक्ष सुनील तटकरे, खासदार अनंत गिते, हुसेन दलवाई, डॉ. नीलेश राणे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री भास्कर जाधव, उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार सदानंद चव्हाण या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. मृदुला दाढे-जोशी यांचा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
कादंबरीकारांचा सहभाग असलेला ‘जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी’, राजकीय नेत्यांचा सहभाग असलेला ‘यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र’, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो’,  चित्रकार आणि व्यंगचित्रकारांचा सहभाग असलेला ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ असे चार परिसंवाद दुसऱ्या दिवशी (१२ जानेवारी) होणार आहेत. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली निमत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. बालकुमारांसाठी ‘बालजल्लोष’, निमंत्रित कथाकारांचा सहभाग असलेला ‘कथाकथन’, ‘विदेशातील मराठीचा जागर’, ‘कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था’, ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ असे तीन परिसंवाद अखेरच्या दिवशी (१३ जानेवारी) होणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप आणि खुले अधिवेशन होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची निर्मिती असलेल्या ‘शंभर नंबरी सोने’ कार्यक्रमाने संमेलनाचे सूप वाजेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साहित्य संमेलन स्थळाचे यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यासपीठ असे संमेलनाचा उद्घाटन आणि समारोप कार्यक्रम होणाऱ्या व्यासपीठाला नाव देण्यात आले आहे. ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ हा परिसंवाद शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे, अशी माहिती संमेलनाचे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या निमंत्रक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven conversationastwo poem samelan in chiplun sahitya samelan