हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा त्यांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत. पाहुयात त्यांची अशीच काही खास गुणवैशिष्ट्ये जी आपल्यालाही स्वीकारता येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते. धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही. सर्व धर्मासंबंधी सहिष्णू भाव असल्याने राज्य मोठे होते. ही राजांची ठाम धारणा होती.

– अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले मात्र ते करत असताना महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष कधी केला नाही.

– शिवाजी महाराजांनी मशिदी कुराण या मुसलमानांच्या श्रद्धास्थानांना आपल्या सैनिकांनी कोणताही उपद्रव देऊ नये अशी सक्त ताकीद दिली होती.

– महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही. महिलांवर अत्यचार करणाऱ्यांना अगदी कडक शासन केले जाई. तसेच अगदी शत्रूच्या राज्यातल्या स्त्रियांना देखील आदरानं वागवावं अशी ताकीद महाराजांनी दिली होती. ‘स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो’ अशी महाराजांची भूमिका होती.

– महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या मात्र एकनिष्ठ असणाऱ्या शूर, त्यागी मावळ्यांची साथ घेतली. महाराजांच्या सैन्यात दर्या सारंग, दौलतखान, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहीम, इब्राहीम खान हे सर्व मुस्लिम होते आणि महाराजांच्या विश्वासातील होते.

– स्वराज्यातील गरिब शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कमा नये असा आदेश त्यांनी दिला. दृष्काळाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांचा महसूलही माफ केला होता.

– महाराजांच्या आरमारांचा इंग्रज, डच, फ्रेंच अशा सर्वच परकीयांमध्ये दबदबा होता. स्वराज्याचे आरमार उभारण्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांची कामगिरी मोलाची होती. आरमार उभारणीत मोठ्या प्रमाणात लाकडाची गरज होती. त्या काळी घनदाट जंगलं होती पण तरीही वृक्षसंवर्धनाचा आदेश महाराजांनी दिला. झाडे म्हणजे रयतेची लेकरं आहेत, रयतेनी ती मुलाबाळांप्रमाणे वाढवली त्यामुळे झाडं तोडताना त्यांनाही विश्वासात घ्या असा आदेश त्यांनी दिला.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivjayanti 2019 interesting characteristics of chhatrapati shivaji maharaj that we should fallow