शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजपवर टीका केली जात असली तरी त्यांनी आपण सत्तेत आहोत, याचे भान ठेवून गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
नेहरू युवा केंद्रात पं. दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे छायाचित्र लावण्याचे आदेश देण्यात आले असतील तर काहीच गैर नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सरकारने एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सवय आहे. पं. दीनदयाल उपाध्याय व श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या प्रेरणेतून पक्षाची वाटचाल सुरू आहे.
आघाडीच्या काळातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात बोलताना गिरीश महाराज म्हणाले, या घोटाळ्याचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जी काही कागदपत्रे हवी आहेत ती पुरविली जात आहेत. घोटाळ्याच्या चौकशीबाबत कुठलीही दिरंगाई केली जात नाही.
कुंभमेळ्यात कंडोमचा विषय गाजत असताना त्या संदर्भात माझ्याकडे कुठलीही तक्रार किंवा कुठलेही निवेदन आले नसल्याने त्यावर चर्चा करणे योग्य नाही. कुंभमेळ्याच्या संदर्भात कुठलेही वाद नाहीत. प्रसारमाध्यमातून ते ऐकिवात आहेत असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरसंघचालकांना निमंत्रण
कुंभमेळा समितीचा अध्यक्ष म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. १४ जुलैला नाशिकमध्ये कुंभमेळ्यात होणाऱ्या ध्वजारोहणाला सरसंघचालकांनी उपस्थित राहावे, अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. मात्र त्या दिवशी त्यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत. मात्र कुंभमेळा तीन महिने चालणार असल्यामुळे या काळात त्यांनी एक दिवस येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shiv sena should be understanding of power says girish mahajan