नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'शक्तिमान.' त्यावेळी शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण एक दिवस अचानक शक्तिमान गायब झाला. तो कुठे गेला? का गेला? हे आज पर्यंत कोणाला कळाले नाही. आता खुद्द शक्तिमान उर्फ मुकेश खान्ना यांनी मालिका बंद होण्यामागचे कारण सांगितले आहे. 'सुरुवातीला शक्तिमान ही मालिका शनिवारी सकाळी आणि मंगळवारी संध्याकाळी प्रदर्शित व्हायची. नॉन प्राइम टाइम असूनही मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मालिकेसाठी दूरदर्शन वाहिनीला ३.८० लाख रुपये द्यावे लागत होते. मालिकेच्या १०० ते १५० एपिसोडने चांगली कमाई केली होती' असे मुकेश खन्ना म्हणाले. आणखी वाचा : ‘कहो ना प्यार है’नंतर या दाक्षिणात्य सुपरस्टारला येऊ लागला हृतिकचा राग मालिकेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, 'दूरदर्शन वाहिनीने मला सल्ला दिला की शक्तिमान इतकी लोकप्रिय मालिका आहे. ती रविवारी प्रदर्शित करायला हवी. त्या दिवशी लहान मुलांना सुट्ट्या असतात. मालिका रविवारी प्रदर्शित करण्यासाठी मला ७ लाख ८० हजार रुपये द्यावे लागत होते. तरीही मी मालिका सुरु ठेवली. पण ही रक्कम जास्त असल्याने माझे नुकसान होऊ लागले होते. मला शक्तिमान ही मालिका बंद करायची नव्हती पण माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे मला ती बंद करावी लागली' असा खुलासा पुढे मुकेश यांनी केला.