एखाद्याच कलाकारावर जोर देत जेव्हा चित्रपटाचा डोलारा उभा असतो, तेव्हा कथानक पूर्णपणे खिळवून ठेवणारे वा वेधक नसेल तर ते कोसळण्याची शक्यता अधिक असते. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित दिनेश विजन दिग्दर्शित ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाच्या बाबतीत काहीसा असाच प्रकार झाला आहे. चित्रपटाची चमकदार कथाकल्पना आणि राजकुमार रावसारखा कसलेला अभिनेता असूनही करण शर्मा दिग्दर्शित ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट मनोरंजनाच्या अपेक्षापूर्तीत फिका पडला आहे.

वाराणसीतील रंजन या तरुणाची कथा ‘भूल चूक माफ’ या चित्रपटात आहे. उदरनिर्वाहासाठी काहीच करत नसलेला, कशाचीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या रंजनचं तितलीवर खूप प्रेम आहे. रंजन आणि तितलीला लग्न करायचं आहे, पण तितलीच्या वडिलांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे. दोन महिन्यांत सरकारी नोकरी मिळवली तरच तितलीशी लग्न करून देईन, असे तिचे वडील रंजनला सुनावतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रंजन हरतऱ्हेचा जुगाड करून पाहतो. अगदी त्यासाठीही तितलीकडूनच पैसे उभे करतो, त्याचा जुगाड फळतो आणि त्याला नोकरीही मिळते. त्याचं तितलीशी लग्न ठरतं, हळदीचा कार्यक्रम रंगतो आणि दुसऱ्या दिवशी लग्न होणार या सुखस्वप्नात रमलेला रंजन सकाळी उठतो खरा… मात्र लग्नाचा दिवस उजाडतच नाही. त्याच्यासाठी काळ हळदीच्या दिवसावर येऊन थांबतो. रोज उठायचं, हळद लावून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख म्हणत झोपायचं… मात्र सकाळी उजाडली की घड्याळ पुन्हा हळदीच्या दिवसावरच येऊन थांबलेलं असायचं. या थांबलेल्या कालचक्रातून बाहेर कसं पडायचं? आपल्या हातून अशी काय चूक झाली आहे ज्यामुळे आपलं आयुष्य या एका दिवसावर येऊन अडकलं आहे? या प्रश्नांनी हैराण झालेला रंजन वाराणसीतले घाट, देऊळ पालथे घालतो. अखेर त्याला त्याच्या या समस्येतून बाहेर पडण्याचा उपाय सापडतो. पण, तो उपाय त्याला पुन्हा एकदा मूळपदावर आणणार असतो. काळाच्या या गोंधळातून रंजन कसा बाहेर पडतो? ही खरंतर या चित्रपटाला इतरांपेक्षा वेगळं ठरवणारी चमकदार कथाकल्पना आहे.

आपल्या आयुष्यात सुख यावं म्हणून काहीही कष्ट न करता, केवळ जुगाड करून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणारे रंजनसारखे तरुण आज जागोजागी आहेत. मात्र, अशा पद्धतीने नोकरी मिळवताना आपण खरोखरच त्या कामासाठी पात्र असलेल्या कोणातरी व्यक्तीच्या तोंडचा घास हिरावून घेतो आहोत, याची किंचितशी जाणीव अशा तरुणांना नसते. पैशाच्या जोरावर कमी गुण असूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणारे, कुठलीही परीक्षा न देता, चप्पला न झिजवता सरकारी वा चांगल्या खासगी कंपनीत नोकरी मिळवणारे कोणा ना कोणा गरजू आणि मेहनती व्यक्तीच्या आयुष्याच्या स्वप्नांची, त्याच्या घरच्यांच्या आयुष्याची एका क्षणात धूळधाण करतात, याची जाणीव या चित्रपटात लेखक – दिग्दर्शक करण शर्मा यांनी करून दिली आहे. मात्र, हे करत असताना रंजनची व्यक्तिरेखा तितक्या चमकदारपणे उठून येत नाही. किंबहूना, जागोजागी परिस्थितीला शरण जाणारा रंजनच पुन्हा पुन्हा जाणवतो. शिवाय, कथेचा इतका सुंदर भाग हा मध्यंतरानंतर चित्रपटात येतो. त्याआधीचा भाग आयटम साँग, प्रेमगीत अशा गोष्टींवर वाया गेला आहे.

खरंतर सीमा पहावा, रघुवीर यादव, संजय मिश्रा, झाकीर हुसैन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. तरीही चित्रपटाचा सगळा भार राजकुमारच्या व्यक्तिरेखेवर आहे. आणि त्या अर्थाने राजकुमार रावच्या अभिनयावरच चित्रपट तरला आहे. वामिका गब्बी उत्तम अभिनेत्री असली तरी तिला नायिकेची गोडगुलाबी भूमिका करण्याशिवाय काही वाव मिळालेला नाही. राजकुमार राव अशा भूमिकांसाठी चांगलाच सरावला आहे, तो सहजी या व्यक्तिरेखांना आपलं काही देऊन जातो. त्यामुळे रंजनची व्यक्तिरेखाही मनोरंजन करण्यात कमी पडत नाही. पण ते सोडलं तर एकूण कथेच्या पातळीवर आणि चित्रपटाचा एकसंध प्रभावी परिणाम याची अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट फिका पडला आहे.

भूल चूक माफ

दिग्दर्शक – करण शर्मा

कलाकार – राजकुमार राव, वामिका गब्बी, सीमा पहावा, रघुवीर यादव, संजय मिश्रा, झाकीर हुसैन.