ऐन उमेदीच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत या ३४ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना प्रचंड धक्का बसला आहे. म्हणूनच सुशांतच्या मित्राने त्याच्या आठवणीमध्ये काही गरजू कुटुंबांची पोटं भरण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्याची पत्नी प्रज्ञा कपूर यांनी ३४०० कुटुंबांमध्ये जेवण वाटप करणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्रज्ञाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या लॉकडाउनमध्ये अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या गरजूंची भूक भागविण्यासाठी आणि सुशांतच्या स्मरणार्थ प्रज्ञा आणि अभिषेक या नागरिकांमध्ये जेवण वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रज्ञाच्या ‘एक साथी’ या संस्थेअंतर्गत ही मदत पुरवली जाणार आहे.
प्रज्ञाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. “सुशांत तुझी फार आठवण येईल”, असं कॅप्शन देत प्रज्ञाने गरजूंना मदत करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्य आल्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या मृत्युनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.