नाटककार शफाअत खान यांनी ‘मुंबईचे कावळे’ लिहून आता चाळीस वर्षे लोटलीयत. छबिलदास नाटय़-चळवळीत त्याकाळी अनेक धडपडे नवोन्मेषशील रंगकर्मी आशय-विषय-सादरीकरणाचे नानाविध ‘प्रयोग’ सादर करत. आणि मग त्यावर सगळे मिळून झडझडून चर्चा, टीकाटिपण्णीही करत. त्यात उगवते लेखक शफाअत खान हेही एक होते. यादरम्यान- म्हणजे १९७८ साली सादर झालेलं त्यांचं ‘मुंबईचे कावळे’ हे मुक्तनाटय़ाच्या फॉर्ममधलं नाटक नुकतंच ‘आविष्कार’ संस्थेनं पुनश्च रंगमंचावर आणलं आहे. याला निमित्त ठरलंय.. शफाअत खान यांना मिळालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराचं. हे नाटक आजही तेवढंच समकालीन अन् संदर्भित वाटतं. वर्तमान सामाजिक-राजकीय व्यवस्थेची झाडाझडती घेत असताना प्रायोगिक मंचावर लोकरंगभूमीच्या शक्यता तपासणारं हे नाटक. त्यात आधुनिक रंगभूमीच्या तथाकथित कर्त्यांनी नाटकाच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचा गंध नसलेले लोककलावंत सादर करत असलेल्या नाटकाकडे तुच्छतेनं पाहण्याचा दृष्टिकोनही लेखकानं जाता जाता मांडला आहे. अर्थात आज तो तितकासा ठळक उरलेला नाही, हेही खरं. तर..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका गावात झालेल्या भीषण संहारक वादळानंतर सगळं गाव उद्ध्वस्त झालेलं असताना दोन वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते तिथं मदतीसाठी पाठवले जातात. पैकी एक असतो- निधर्मी पक्षाचा. सत्ताधारी. तर दुसरा धर्मनिष्ठ.. विरोधी पक्षाचा. शिस्तबद्ध; परंतु नुसताच बोलघेवडा. गावात प्रेतांचा सडा पडलेला. ती कुजून दरुगधी यायला लागलेली. तशात गावात औषधालाही माणूस उरलेला नाही अशी स्थिती. अशा निर्मनुष्य गावात सेवाकार्य करायला आलेले हे दोघे. पण काम करायचं तरी कुठलं? शेवटी मेलेल्या माणसांची विल्हेवाट लावण्याचं काम करायचं ते ठरवतात. पण अंत्यसंस्कार करायचे म्हणजे ती व्यक्ती ज्या धर्माची आहे त्यानुसार अंत्यविधी करावे लागणार. म्हणजे आली का पंचाईत! मृतांची जिथे ओळख पटवणंच मुश्कील; तिथं त्यांचा जात-धर्म कळणार कसा? तरीही ते एक सडलेलं प्रेत कसंबसं स्मशानात घेऊन जातात. तर तिथला स्मशानकर्मी त्यांच्याकडे मृताचं मृत्यू प्रमाणपत्र मागतो. ते आणि आता कुठून पैदा करायचं? वर तो मृताची जात, धर्म वगैरेही चौकश्या करायला लागतो. हे नस्तं लचांड मागे लावून घेण्यापेक्षा ते मग एका मृत गाढवावर अंत्यसंस्कार करायचं ठरवतात. पण तिथंही गाढवाची जात काय, हा प्रश्न उपस्थित होतोच. म्हणजे मग त्याच्या मालकाची जात शोधणं आलं! त्याच्या जाती-धर्मावरून मग गाढवाला जाळायचं की पुरायचं, याचा निर्णय होणार! दोघं सेवाकार्य करण्यासाठी (नाइलाजानं!) आले होते खरे, पण ही नको ती खेकटं मधे मधे उद्भवत होती.

दरम्यान, शेजारच्या गावांत पळून गेलेली माणसंही आपल्याला मदत मिळणार या लालसेनं परत येऊ लागलेली. मात्र, त्यांचे वेगळेच प्रश्न होते. परदेशी मदत म्हणून आलेले कपडे या लोकांना भलतेच ‘फनी’ वाटत होते. आजवर धोतर-लुगडं नेसायची सवय असलेल्यांना हे पाश्चात्त्य कपडे वापरायचे कसे, असा प्रश्न पडलेला. शिवाय ज्यांचे नातलग वादळात गेले होते त्यांच्या अंत्यविधीचा आणि त्यांच्या मोक्षाचाही प्रश्न आ वासून होताच. नातलगांचे सगळे विधी पारंपरिक पद्धतीनंच व्हायला हवेत अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्यांना मृतांच्या पिंडाला शिवण्यासाठी कावळे हवे होते. कारण गावातलेच नव्हे, तर पंचक्रोशीतलेही कावळे बेपत्ता झाले होते. तेव्हा या कार्यकर्त्यांनी पिंडासाठी कावळे मिळवून द्यावेत अशी त्यांची जोरदार मागणी होती. यावर निधर्मी पक्षाचा कार्यकर्ता पोपटाला काळा रंग फासून कावळा बनवण्याची शक्कल लढवतो. परंतु पोपटानं मधेच ‘मिठू मिठू’ ओरडून घात केला आणि दोघा कार्यकर्त्यांना चांगलीच तडी पडली. शेवटी मंत्रालयातून संबंधित खात्याकडून कावळे मागवण्याचं ठरतं. पण तेही सरकारी लालफितीच्या कारभारात आणि बेपर्वा यंत्रणेत कसं अशक्य होऊन बसतं याचं अत्यंत उपरोधिक चित्रण ‘मुंबईचे कावळे’मध्ये पाहायला मिळतं.

शफाअत खान यांनी हे मुक्तनाटय़ त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात लिहिलं आहे. तिरकस विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या या लेखकाची बोचरी, उपहासगर्भ शैली प्रारंभीच्या त्यांच्या या नाटकातही प्रत्ययाला येते. नाटकाची शैली जरी मुक्त असली, तरीही त्यात आशयाची आंतरिक वीण मात्र घट्ट आहे. तांत्रिक अंगांची फारशी मदत न घेता केवळ आशयावर प्रेक्षकांचं लक्ष केन्द्रित व्हावं अशी या नाटकाची रचना आहे. त्यात कमालीचा मॅडनेसही आहे. गंमत म्हणजे आज ४० वर्षे उलटूनही या नाटकातला आशय फिका झालेला नाही. उलट, तो समकालाला अधिकाधिक कवेत घेताना दिसतो. याचं कारण त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. किंबहुना, परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. आजची राजकीय व्यवस्था, सरकारी यंत्रणेतील बेमुर्वतखोरपणा, मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची वृत्ती आणि जातीधर्माच्या उंच भिंती आता आणखीनच विकट झाल्या आहेत. सामान्य माणसाची या सगळ्यांत होणारी होरपळ आजही कायम आहे. ‘अच्छे दिन’चे दावे करणारेच त्यांना पिळून काढत आहेत. आणि ज्यांचं त्यात शोषण होतंय त्यांना याचा पत्ताच नाहीए. आजूबाजूचा कोलाहल एवढा टिपेला नेऊन ठेवला गेलाय, की सामान्यांना आपलं शोषण जाणवूही नये असा कडेकोट बंदोबस्त केला गेलाय. या साऱ्याचं स्वच्छ प्रतिबिंब ‘मुंबईचे कावळे’त कुणाला आढळलं तर त्यात नवल नाही.

दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी हे मुक्त शैलीतलं नाटक तशाच मोकळ्याढाकळ्या पद्धतीनं बसवलं आहे. त्यातला आशय आणखीन टोकदार करून वर्तमानाचा धांडोळा घेण्याचा यत्न त्यांनी केला आहे. त्यासाठी अर्कचित्रात्मक पात्रांचा आधार घेतला आहे. छोटे छोटे प्रसंग व त्यांतला उपरोधिक आशय बाहेर काढण्यावर त्यांनी भर दिला आहे. लोकपरंपरेतली एकाच कलावंताने अनेक पात्रं साकारण्याची लवचीक युगत त्यांनी त्यासाठी वापरली आहे. शून्यातून ‘नाटय़’ निर्माण करण्याची ‘मुंबईचे कावळे’ची ताकद लाजवाब म्हणावी अशीच. दिग्दर्शकानं नेपथ्यादी तांत्रिक अवडंबराला यात बुद्धय़ाच फाटा दिला आहे. तो योग्यच आहे. गणेश चंदनशिवे यांनी यातली गाणी लिहिली असून संगीताचीही जबाबदारी त्यांनीच पेलली आहे. रवी-रसिक यांची प्रकाशयोजना गरज भागवणारी आहे. विजय कोरगावकर यांनी गायनाची बाजू सांभाळली आहे. सुभाष खरोटे आणि गौतम सोनावणे यांची संगीतसाथ प्रयोगाच्या रंगतीत मोलाची भर घालते. अनिल बाबुराव शिंदे यांनी बेरकी गावकऱ्यासह अन्य छोटय़ा छोटय़ा भूमिकांत धमाल आणली आहे. ऋषिकेश शेलार आणि विक्रांत कोळपे यांनी निधर्मी आणि धर्मनिष्ठ पक्ष-कार्यकर्त्यांची झूल यथार्थपणे चढवली आहे. त्यांच्या कथनी आणि करणीतला फोलपणा व विसंगती त्यांनी नेमकेपणानं दर्शविली आहे. प्रशांत लोखंडे यांनी मतलबी गाववाला छान वठवला आहे. प्रशांत त्रिभुवन (पीडित गावकरी) आणि डॉ. मंगेश क्षीरसागर (सूत्रधार) यांनी आपली कामं चोख बजावली आहेत. एकुणात, आजच्या परिस्थितीवर भाष्य करू पाहणारं हे मुक्तनाटय़ जरूर पाहायला हवं असंच आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai che kawale shafaat khan priyadarshan jadhav