‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनि सोवळे ठेवले घालुन घडी। हाती घेतली मशाल तमाशाची लाज लावली देशोधडी’! असा आत्मगौरव करत तमाशा कलेला सुवर्णयुग दाखवणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या नावाचा विसर महाराष्ट्राला कधीच पडू शकत नाही. तमाशाने झपाटलेली आसामी असं शाहीर पठ्ठे बापूराव यांचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आजचा पैसा उद्या पाहायचा नाही, आजची लावणी उद्या गायची नाही, या तत्त्वाशी एकनिष्ठ असणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव यांनी स्वत:चे काव्य व पहाड़ी आवाज या जोरावर तमाशाला नवे वळण दिले. त्यांनी आपल्या हयातीत दोन लाखांहून अधिक लावण्या लिहिलेल्या आहेत. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक र्मिंलद कृष्णा सकपाळ यांनी या चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे. कांतीलाल भोसले, नीलेश बबनराव देशमुख, रोहन अर्रंवद गोडांबे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव’ आणि ‘पठ्ठे बापूरावांच्या शोधात’ या पुस्तकांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा राहुल डोरले यांची आहे. गीतकार गुरू ठाकूर यांच्या लेखणीतून गीते साकारली आहेत. छायांकन केको नाकाहारा यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर संतोष फुटाणे तर रंगभूषा-केशभूषा विक्रम गायकवाड यांची आहे. वेशभूषा सचिन लोवलेकर तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी मंदार कमलापूरकर सांभाळणार आहेत. सुपर वार्इंजग प्रोड्युसर भास्कर पावस्कर आहेत. सांस्कृतिक परंपरेतील महाराष्ट्राची एक प्रमुख ओळख म्हणजे लावणी. या लावणीच्या शृंगाराचे सौंदर्य खुलवण्याचे काम शाहीर पठ्ठे बापूराव यांनी केले. श्रीधर कृष्ण कुलकर्णी ते शाहीर पठ्ठे बापूराव हा त्यांचा कलंदर प्रवास नेमका कसा झाला, हे या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे.