पण व्हॅनिटीचा आणि बूचबंद पाण्याच्या बाटलीचा उगम होण्यापूर्वी उन्हातान्हात कसे बरे शूटिंग्ज झाली असतील? त्या काळात स्टारच्या डोक्यावर रंगीत छत्री घेऊन उभा असलेला मनुष्य हमखास दिसे. आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळेस तर त्याच छत्रीखाली एखादी तारका असणार हे बघे पटकन ओळखत. पण ते ऊन, उष्णता सहन करीतच ती अभिनय वा नृत्य करतेय याच्याशी त्याना घेणे-देणे नसे.
काळ पुढे सरकला तसे हातातील पंखे जाऊन बॅटरीवर चालणारे आलेले पंखे सेटवर दिसू लागले. मोठ्या चित्रपटांची नेमकी उन्हाळ्यात विदेशातील चित्रीकरणे प्लॅन होऊ लागली. येथेही दिग्दर्शक दिसतो म्हणूया. कुटुंबवत्सल स्टार याच काळात ‘सुट्टी घेऊन कुटुंबासह विदेशवारी’ करु लागला. दैनंदिन मालिकेत काम करणारे असे काहीच करु शकत नाहीत. तरी बरं, मालिका युगातील एकता कपूरचा ओशिवरातील बालाजी स्टुडिओ वातानुकूलित आहे. समोरचाच यशराज स्टुडिओही असाच एसी आहे. अर्थात ही एकविसाव्या शतकातील वाटचाल. पण तत्पूर्वी काय? घामाच्या धारेने मेकअप उतरला तरी अभिनय उंचीवरच राह्यचा. याचे कारण या क्षेत्रात काम करताना उन, पाऊस, थंडी सहन करायला हवीच ही त्या काळातील मानसिकता होती. आताचे कलाकार उन्हाळ्यात आपण भरपूर सॅलड खातो, ताक पितो, शहाळ्याच्या पाण्याला पसंती देतो असे मुलाखतीत सांगतात. तेही काय करणार म्हणा, उन्हात उभे राहून अभिनय कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते. ते शिक्षण वातानुकूलित क्लासमध्ये घेतलेले असते. उन्हाळ्यातील चित्रपटसृष्टीतील घडामोडी या काहीशा अशा. तर पटकथेत उन्हाचा कधी संदर्भ नसला तरी गाण्यात आलाय. ‘गिरफ्तार’ चित्रपटात अमिताभ माधवीला उद्देशून म्हणतो, ‘धूप मे निकला ना करो रुप की रानी…’
दिलीप ठाकूर