कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे पालिका शाळांसाठी अपंग प्रवर्गातील कर्णबधिर, मूकबधिर, बहुविकलांग उमेदवारांची भरती करण्यात येणार होती. गुरुवारी मुलाखत प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच या भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याचे स्पष्ट करीत प्रशासनाने ही मुलाखत प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून आलेल्या २७ उमेदवारांना या गोंधळाचा फटका बसला.
शिक्षण मंडळाने सप्टेंबरपासून अपंग प्रवर्गातील या उमेदवारांची भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी जाहिरात, लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. एकूण अकरा उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. या भरतीसाठी एकूण ४४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामधील २७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. या उमेदवारांना गुरुवारी मुलाखत असल्याची पत्रे प्रशासनाने पाठविली होती. सोलापूर, सातारा, बीड, औरंगाबाद, नगर आदी भागातून उमेदवार या मुलाखतीसाठी आले होते. परंतु, अचानक पालिका प्रशासनाने या प्रक्रियेत दोष असल्याचे सांगत मुलाखत प्रक्रिया थांबवीत असल्याचे जाहीर केले. यामुळे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवार आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला.
उपायुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेसाठी सेवा नियोजन कार्यालयात नोंदणी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याची शासनाची अट आहे. ही अट दुर्लक्षून ही प्रक्रिया करण्यात येत होती. त्यामुळे या प्रक्रियेत गोंधळ असल्याचे उघड झाल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicap recruitment suddenly close in kdmc