पाच वर्षांत अपघातग्रस्तांना केवळ ५० कोटींच्या आत नुकसान भरपाई, आता लक्ष्य १६० कोटींचे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी राज्यभरातील एसटी अपघातातील जखमी तसेच मृत प्रवाशांच्या वारसांना मूठभर नुकसान भरपाई दिली जात असताना महामंडळाकडून मात्र सर्वसामान्य प्रवाशांकडून कोटय़वधी रुपयांची वसुली केली जात असल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाने यापुढे किमान १६० कोटींच्या वसुलीचे ‘लक्ष्य’ ठेवले आहे.

दरवर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सरासरी २४० कोटींत आहे. यात मृत्यूंचा आकडा ४५०च्या वर असतो. अशा राज्यभरातील सर्व अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई अधिक मिळावी, यासाठी एसटीने १ एप्रिलपासून ‘बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना’ सुरू केली. यासाठी प्रत्येक प्रवाशांकडून १ रुपया शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. मात्र प्रवाशांच्या संख्येनुसार आकारण्यात येणारी रक्कम आणि प्रत्यक्षात दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई यात प्रचंड तफावत आहे. आता नुकसान भरपाईची रक्कम  १० लाख रुपये केली आहे. ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती एसटी अपघातात मृत पावल्यास अशा व्यक्तींच्या वारसाला नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी काही वकील त्या व्यक्तीच्या घरी जातात. यात अशिक्षित लोकांना रक्कम मिळवून देऊ, मात्र त्यासाठी लाखो रुपयांची फी द्यावी लागेल, अशी कबुली घेतात. यात अधिकाऱ्यांसह अनेक टोळ्या ‘कार्यरत’ असल्याचे सांगण्यात आले.

अपघात सहाय्यता निधी योजनेतून जमा होणारी रक्कम एका विश्वस्त संस्थेची स्थापना करून त्यात ठेवली जाणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य सरकारची परवानगी घेतली जाणार आहे. या योजने अंतर्गत आकारली जाणारी रक्कम अधिक असल्यास या निधीचा वापर प्रवाशांना सुविधा देण्यासाठीही केला जाऊ शकतो.
– रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahamandal fake recovery under accident insurance