पतीसोबत घरगुती नातेसंबंधांमध्ये असणाऱ्या महिलेला घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करता येऊ शकेल, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दोन मुलांना पतीकडेच ठेवून भारतात परतलेल्या पत्नीचा अर्ज फेटाळून लावताना न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी हा निर्णय दिला.
या महिलेचा १९९९ साली विवाह झाला होता. लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकत राहत होती. फेब्रुवारी २००९ मध्ये ती दोन्ही मुलांना नवऱ्याकडेच सोडून भारतात परतली. जानेवारी २०१० मध्ये तिने घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पतीविरोधात तक्रार दाखल केली. परंतु तक्रार दाखल करण्याच्या वेळी तिचे पतीशी कुठल्याही प्रकारचे नातेसंबंध नव्हते. त्यामुळे ती या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करू शकत नाही, असे स्पष्ट करीत कनिष्ठ न्यायालयाने तिची तक्रार फेटाळून लावली होती. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशावर न्यायमूर्ती दळवी यांनी शिक्कमोर्तब केले. तसेच निकालाच जी पत्नी पतीसोबतच्या सर्व नातेसंबंधांतून बाहेर पडून भारतात परतली आणि त्यानंतर एक वर्षभर तिने तक्रार केलेली नाही. अशा पत्नीला घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करता येऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्याच वेळी एखादी महिला पतीसोबत नातेसंबंधात होती.
मात्र त्याच नातेसंबंधांमुळे तिला घरगुती हिंसाचारा सामोरे जावे लागले आणि पर्यायाने नातेसंबंधांतून बाहेर पडावे लागले, अशा स्त्रीला मात्र घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पतीविरोधात तक्रार दाखल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायमूर्ती दळवी यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women has relation with husband has right to complain high court