शहरातील सीमेंट क्राँक्रीटीकरण आणि सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणामुळे नवी मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले असले तरी दगडखाण आणि इतर शहरांतून येणाऱ्या राडारोडय़ा (डेब्रिज)मुळे धुळीकरणाद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात घट झालेली नाही, असे मत पालिकेने सादर केलेल्या यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे पालिकेने साडेचारशे कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या पाच सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ठाणे खाडीकिनारा आजही प्रदूषित असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंद करण्यात आले आहे. ठाणे खाडीचा २२ किलोमीटरचा किनारा नवी मुंबई पालिका क्षेत्रात येतो. पालिकेने सांडपाणी कितीही शुद्ध करून खाडीत सोडले तरी आजूबाजूच्या पालिका-नगरपालिका हा किनारा अशुद्ध करीत आहेत. नवी मुंबई पालिका प्रशासनाने पंधरावा पर्यावरण स्थिती अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला. पालिकेने गेल्या काही वर्षांत केलेल्या पर्यावरणविषयक उपाययोजनांमुळे नवी मुंबईतील रहिवाशांचे जीवनमान उंचावल्याचा दावा पालिका करीत आहे. चार वर्षांपूर्वी रहिवाशांचा जीवनमान निर्देशांक ७३ .७० टक्के होता तो आता ७५. ५२ टक्के झाला आहे. पालिकेने ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे या चार ठिकाणी हवेतील सल्फर डाय ऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, धुलीकण, ओझान, कार्बन मोनोऑक्साईड, मिथने या रासायनिक पदार्थाचे प्रमाण तपासण्यासाठी हवा गुणवत्ता केंद्र उभारली आहेत. त्यात मागील वर्षांपेक्षा हवेतील नायट्रोजन ऑफ ऑक्साईड आणि पीएम २.५ हे प्रमाण सुधारले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत होते. ते आता कमी झाले आहे. पालिकेनेही मोक्याच्या १९ चौकांचे सीमेंट क्राँक्रीटीकरण व दुभाजकांवर लावलेली हिरवाई याचा परिणाम या हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे. शहरातील धुलीकरणाद्वारे होणाऱ्या प्रदूषणावर पालिका अद्याप मात करू शकलेली नाही. शहरात २०० पेक्षा जास्त दगडखाणी असून त्यांचे प्रदूषण कायम असून यात डेब्रिजच्या प्रदूषणाची भर पडली आहे. नवी मुंबईतील बांधकामांचे डेब्रिज तर या शहरात अनेक ठिकाणी पडलेले दिसत असताना मुंबईत होणाऱ्या मोठय़ा प्रमाणातील बांधकामांचे डेब्रिज नवी मुंंबईत बिनदिक्कतपणे टाकले जाते. पालिकेने १७९ वाहनांवर कारवाई करताना अडीच हजार टन डेब्रिज पडल्याचे या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारे आजही या शहरात ‘चोरी चोरी चुपके चुपके’ डेब्रिज आणून टाकले जात असून या गोरख धंद्यात काही अधिकारी व नगरसवेकांची मिलीभगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे डेब्रिजमाफिया खारफुटी व पाणथळींच्या जागी हे डेब्रिज टाकत आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही याबाबत पालिकेचे कान टोचले आहेत. त्यामुळे शहरातील डेब्रिज पर्यावरणाच्या मुळावर येऊ लागले आहे. पालिकेने करोडो रुपये खर्च करून पाच सांडपाणी केंद्रे उभारली आहेत. त्यातील १८० दशलक्ष लिटर पाणी ठाणे खाडीत सोडले जात आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. केवळ नवी मुंबई पालिकेने असे पाणी सोडून उपयोग नसल्याने दुसऱ्या पालिका आपला जुना कित्ता रंगवीत असल्याने या खाडीत केमिकल ऑक्सिजन डिमान्ड, क्लोराराईडस, सस्पेंडेड सॉलिडस या प्रदूषकांची मात्रा मोठय़ा प्रमाणात आढळून आल्याने हा किनारा आजही दूषित आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2015 रोजी प्रकाशित
शहरातील राडारोडा पर्यावरणाच्या मुळावर
पालिकेने सादर केलेल्या यावर्षीच्या पर्यावरण स्थिती अहवालात स्पष्ट केले आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-09-2015 at 00:58 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmental status report says navi mumbai air pollution not yet decline