जंगलात मोठय़ा प्रमाणावर वणवे लागल्याचे आपण अनेकदा वाचतो. अ‍ॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्ये २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षी लागलेल्या वणव्यांची आग काही महिने धुमसत होती. या वणव्यांचे विपरीत परिणाम अर्थातच त्या जंगलात असलेल्या जीवसृष्टीवर, सभोवतालच्या पर्यावरणावर आणि हवामानावरसुद्धा झाले. वणवे लागण्यामागे नैसर्गिक प्रक्रिया कारणीभूत असू शकते, त्याचबरोबर मानवी निष्काळजीपणामुळेसुद्धा वणवे लागतात. अनेकदा विशिष्ट हेतूने जंगलांमध्ये जाणीवपूर्वक आगी लावल्या जातात किंवा रान पेटवले जाते. नैसर्गिकरीत्या वणवे लागण्याचे प्रमाण तसे खूपच कमी आहे. बहुतेक वेळा मानवी दुष्कृत्ये आणि निष्काळजीपणा यांमुळे वणवे लागल्याचे आढळते. अगदी अ‍ॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्येसुद्धा मानवी कृत्यांमुळेच वणवे लागल्याचे आता उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नैसर्गिकरीत्या वणवे कसे लागतात, याविषयी अनेक मते ऐकायला मिळतात. कडक उन्हामध्ये वृक्षांच्या वाळलेल्या फांद्या एकमेकांवर जेव्हा घासल्या जातात, तेव्हा घर्षणाने उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेमुळे आग लागून त्याचे रूपांतर वणव्यात होते, अशी एक सर्वसाधारण समजूत आढळते. मात्र हे वस्तुस्थितीला धरून नाही. याचे कारण म्हणजे कोणतीही वस्तू जळण्यासाठी त्या वस्तूचे तापमान विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. या तापमानाला आपण ‘ज्वलनांक’ म्हणतो. वाळलेले गवत, पालापाचोळा जळण्यासाठी २५० ते २७० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते; तर वृक्षाच्या फांद्या जळण्यासाठी किमान ३०० ते ३५० अंश सेल्सिअस एवढे तापमान लागते. त्यामुळे सोसाटय़ाच्या वाऱ्याने फांद्या एकमेकींवर घासल्या जाऊन एवढे तापमान वाढणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मात्र जर पाऊस सुरू होण्यापूर्वी विजांचा लखलखाट होऊन वीज जमिनीवर पडली तर तापमान सुमारे ३० ते ५० हजार अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे लाकूड सहज पेट घेऊ शकते. सभोवती वाळलेली, वठलेली झाडे, सुकलेला पालापाचोळा असेल तर ती आग झपाटय़ाने पसरते. सोबत वाहणारा वारासुद्धा ही आग पसरवण्यास हातभार लावतो. आग लागल्यावर ताबडतोब पाऊस आला नाही तर ती पसरत जाते आणि वणवा भडकतो. थोडक्यात, निसर्गत: जे वणवे लागतात ते वीज पडल्याने लागतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

आग लागण्यासाठी सामान्यत: तीन गोष्टी आवश्यक असतात. योग्य इंधन किंवा ज्वलनशील वस्तू, त्या वस्तूचे ज्वलनांकापर्यंत पोहोचलेले तापमान आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा या तीन गोष्टी एकत्रित आल्या तर आग लागण्याचा संभव असतो. जंगलात या गोष्टी पावसाळय़ापूर्वी उपलब्ध होत असल्याने वणवे ठरावीक महिन्यांतच लागल्याचे आढळते.     

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about wildfires information zws
First published on: 10-08-2022 at 05:24 IST