तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) कडप्पा जिल्ह्यातील त्यांच्या वार्षिक परिषदेच्या निमंत्रण व्हिडीओसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. टीडीपीचे संस्थापक व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रामा राव (एनटीआर) यांचा आवाज डिजिटल पद्धतीने पुन्हा तयार करण्यात आला आहे.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओमध्ये दिग्गज अभिनेते व राजकीय नेते २७ ते २९ मेदरम्यान कडप्पा येथे होणाऱ्या महानाडू या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांना आमंत्रित करीत असल्याचे दिसत आहेत.
या प्रतिष्ठित नेत्याच्या आवाजाने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि एनटीआर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेटिझन्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
एनटीआर यांच्यासारखाच आवाज असणाऱ्या या एआय कलाकाराने व्हिडीओत म्हटले आहे, “माझ्या प्रिय तेलुगू भगिनींनो व बंधूंनो हार्दिक शुभेच्छा! तेलुगू लोकांना एकत्र करण्यासाठी आणि तेलुगू अभिमान जागृत करण्यासाठी मी सुरू केलेले ‘महानाडू’ आज तेलुगू एकतेचे प्रतीक बनले आहे याचा मला खूप अभिमान आहे. २७, २८ व २९ मे २०२५ रोजी कडप्पाच्या भूमीवर पहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या महानाडू या उत्सवासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.”
पक्षाने ‘महानाडू’ची तयारी, उत्साही कार्यकर्त्यांची जमवाजमव व पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करणारे इतर एआय-शक्तीचे व्हिडीओदेखील प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे पक्षाची धोरणात्मक प्रतिमा आणखी उंचावली आहे.
पक्षाच्या नेत्यांचा असा विश्वास आहे की, ही डिजिटल श्रद्धांजली एनटीआर यांच्या वारशाचा केवळ सन्मानच करीत नाही, तर पाठिंबाही वाढवते. लोकांना भावनिक आणि राजकीयदृष्ट्या टीडीपी पक्षाच्या व्यासपीठाकडे आकर्षित करते.
याव्यतिरिक्त टीडीपीचे सरचिटणीस व आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी मंगळवारी पक्षाच्या तीन दिवसीय वार्षिक परिषदेत सहा प्रमुख संकल्पांची घोषणा केली. तेलुगू समुदायाला जागतिक मान्यता, तरुणांचे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना पाठिंबा देणे व कार्यकर्त्यांना नेता बनवणे या सहा वैचारिक स्तंभांचा या संकल्पनेमध्ये समावेश आहे.
“चंद्राबाबू नायडू यांनी तेलुगू लोकांचा अभिमान जागतिक स्तरावर पोहोचवला आहे. तेलुगू लोकांनी शिक्षण, तंत्रज्ञान, राजकारण व उद्योग या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व केले पाहिजे”, असे लोकेश यांनी टीडीपी समर्थक, नेते व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले. तेलुगू राजकारणात तरुणांना अर्थपूर्ण प्रतिनिधित्व देण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेवर आयटी विभागातील मंत्र्यांनी भर दिला आणि एनडीए आघाडीतील १६४ पैकी ८८ आमदार पहिल्यांदाच आमदार झाले आहेत हेदेखील निदर्शनास आणून दिले.
एनटी रामाराव कोण होते?
एनटी रामाराव यांना एनटीआर म्हणून ओळखले जाते. ते एक भारतीय अभिनेते आणि राजकारणी होते. त्यांनी तीन वेळा (१९८३-८४, १९८४-८९ व १९९४-९५) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांनी १९८२ मध्ये तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) पक्षाची स्थापना केली आणि ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एनटीआर यांचे जावई आहेत; तर भारतातील आघाडीच्या चित्रपट कलाकारांपैकी एक नंदमुरी तारका रामाराव, ज्युनियर (ज्युनियर एनटीआर) हे एनटीआर यांचे नातू आहेत.