‘माहिती तंत्रज्ञानाचे आणि भोगवादी संस्कृतीचे वादळ आपल्या संस्कृतीचा व संचिताचा घास घेतात की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. अशा काळात कवी नारायण सुर्वे यांचे साहित्य समाजाला निश्चितपणे दूरदृष्टी देऊ शकेल,’ असे मत ज्येष्ठ राजकीय नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा’ या संस्थेतर्फे कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गडाख यांना ‘नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुर्वे यांच्या कन्या कल्पना सुर्वे व जावई गणेश घारे, संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन इटकर या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रभाकर साळुंके, सुभाष कड, कैलास आवटे, अशोक शिलवंत, ल. म. कडू, मिलिंद रथकंठीवार, लता ऐवळे-कदम, तानाजी वाघोले आदींचा नारायण सुर्वे पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
गडाख म्हणाले,‘उकीरडय़ावर टाकलेला लहान मुलगा पुढे मोठा कवी होतो आणि स्वत:चे साहित्य निर्माण करतो हे सुर्वे यांचे जीवन अभ्यासल्यास आश्चर्य वाटते. त्यांनी कामगारांचे दु:ख, वेदना मांडल्या, पण त्यात आक्रस्ताळेपणा नव्हता. ते साहित्य क्षेत्रात वेगळे वादळ घेऊन आले आणि सर्वमान्य झाले. आजच्या युगात माहिती-तंत्रज्ञान आणि भोगवादी संस्कृतीची वादळे, विस्मृतीचे वादळ आपल्या संचिताचा घास घेतील की काय अशी भीती वाटते. नारायण सुर्वे यांची आठवण व त्यांचे साहित्य विस्मृतीत जायला नको.’
‘सहिष्णुता हा आपल्या संस्कृतीतील गुण व ताकद आहे. दारिद्य््रााने पिचलेल्या नारायण सुर्वे यांनी कधी आशावाद सोडला नाही. आयुष्यात व आपल्या प्रतिभेत कटुता येऊ दिली नाही. तर आपण का येऊ द्यावी?,’ असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan survey award yashawantrao gadakha