ब्रिटिशांनी दिलेल्या शिक्षणाच्या शहाणपणातून आम्ही धर्म टाकून दिला. आता लोकशाहीमध्ये राजाज्ञा म्हणजे कायदा तोडणारा शक्तिवान असे नवे मूल्य प्रस्थापित झाले आहे. धर्माज्ञा आणि राजाज्ञा हे आपल्या फायद्याचे साधन झाल्यामुळे वैचारिक गोंधळाची परिस्थिती आली. त्यावर मात करण्यासाठी राजाज्ञेला धर्माज्ञेचे बळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘धर्माज्ञा आणि राजाज्ञा’ या विषयावर न्या. चपळगावकर यांचे व्याख्यान झाले. प्राज्ञ पाठशाळेच्या अध्यक्षा डॉ. सरोजा भाटे, वेदाचार्य मोरेश्वर घैसास आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. मा. भावे या वेळी उपस्थित होते.
चपळगावकर म्हणाले, धर्म आणि राजा यात धर्म हाच श्रेष्ठ आहे. राजाने धर्माचे पालन करणे अपेक्षित असून त्याने धर्मावर कुरघोडी करायची नसते. राजाने धर्मातील संहिता आणि रुढीनुसार न्याय दिला पाहिजे. धर्मामध्ये हुकूमशाही निर्माण होऊ नये याची व्यवस्था धर्मामध्येच अंतर्भूत आहे. एका अर्थाने हिंदू धर्म हा चर्चेने वेगळे मत मांडणारा प्रगतिशील, परिवर्तनवादी आणि लोकशाहीवादी आहे. पूर्वी धर्माज्ञा आणि राजाज्ञा एकच होती. मात्र, परकीय आक्रमणामुळे धर्मवचनावर श्रद्धा ठेवणारी प्रजा आणि राजा अशी स्थिती राहिली नाही.
ब्रिटिशांच्या आगमनानंतर नव्या शिक्षणातून आलेल्या शहाणपणातून आम्ही धर्म टाकून दिला. पण, समांतर मूल्यव्यवस्था निर्माण केली नाही. आता लोकशाहीमध्ये राजाज्ञा मोडणे सोपे झाले आहे. ज्यांच्यावर श्रद्धा ठेवावी ते महाराज उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जात असल्याने धर्म आमच्या फायद्याचे साधन झाले आहे. तर, कायदा तोडणारा शक्तिमान हे नवे मूल्य प्रस्थापित झाले आहे. समाजाचे वैचारिक नेतृत्व करणारे लोक कर्मकांडाचा असा समज करून घेत असल्यामुळे धर्मचर्चेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे वैचारिक गोंधळाची स्थिती झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी राजाज्ञेला धर्माज्ञेचे बळ दिले पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politicians should follow religion for rulers chapalgaonkar