अनेक राज्यांमध्ये ‘हस्तकला पर्यटन’ ही संकल्पना पर्यटकांनी उचलून धरलेली असताना पुण्यातील पारंपरिक उद्योगांच्या बाजारपेठा दुर्लक्षितच आहेत. पुण्याची खासियत असलेल्या वस्तूंऐवजी राजस्थानी, गुजराथी, काश्मिरी वस्तूंची पुण्याची आठवण म्हणून खरेदी होत आहे. शहराच्या परिसरात विकसित झालेल्या रिसॉर्ट्समध्ये मांडलेल्या पारंपरिक उद्योगांच्या प्रदर्शनांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असताना प्रत्यक्षात हे उद्योग शेकडो वर्षे जेथे मोठे झाले ती तांबट आळी, बुरुड आळी, कुंभारवाडा पर्यटनाच्या दृष्टीने अविकसितच आहे. तुळशीबागेबाबत पर्यटकांमध्ये औत्सुक्य असले तरी तेथील अस्वच्छता, परिसरातील वाहतूक कोंडी यांचाच अनुभव पर्यटकांना घ्यावा लागतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहलीला गेल्यानंतर परिसरातील ठिकाणे बघण्याबरोबरच स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या वस्तू पर्यटकांकडून खरेदी केल्या जातात. गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश, काश्मीर अशा बहुतेक राज्यांमध्ये पारंपरिक वस्तूंच्या बाजारपेठांबरोबरच या वस्तूंची निर्मिती करणारी ठिकाणे पाहण्याला पर्यटकांची पसंती मिळते आहे. भरतकाम, कोरीव काम, लाकूड काम हे कसे चालते, पारंपरिक व्यवसाय कसे होते, वस्तूंची निर्मिती कशी होते याबाबत असलेले औत्सुक्य हा देखील पर्यटकांना आकर्षित करून घेणारा मुद्दा ठरत आहे. त्यातूनच ‘हस्तकला पर्यटन’ म्हणजेच त्या प्रदेशाची खासियत असलेल्या वस्तूंची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी केलेले पर्यटन ही संकल्पना राबवली जात आहे. एकीकडे पुण्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना आखल्या जात असताना पुण्याकडे असलेला पारंपरिक उद्योगांचा ठेवा अद्यापही दुर्लक्षित आहे.

तांबट आळीत तयार होणारी तांब्याची भांडी हे पुण्याचे वैशिष्टय़. ही भांडी घडवण्याचा व्यवसाय अनेक कुटुंबांनी पिढय़ान्पिढय़ा जोपासला आहे. अनेक परदेशी नागरिक, विद्यार्थी आवर्जून या भागाला भेट देतात. बुरुड आळीत बांबूच्या वस्तू बनवण्याचा उद्योग चालतो.

टोपल्या, सुपे, रोवळ्या याबरोबरच बाजारपेठेच्या मागणीनुसार दिव्याच्या शेड, शोभेच्या वस्तूही इथे तयार होतात. मातीची आकर्षक भांडी, पणत्या, रांजण, फुलदाण्या कुंभारवाडय़ात तयार होतात. पुण्याची ओळख असलेली पुणेरी पगडी रविवार पेठेतील बाजारपेठेत मिळते. एखादा महोत्सव किंवा शहराच्या परिसरात विकसित झालेल्या रिसॉर्टमध्ये या पारंपरिक उद्योगांची ओळख करून देणारे गाळे असतात आणि तेथे पर्यटकही गर्दी करतात. मात्र पिढय़ान् पिढय़ा हे उद्योग ज्या परिसरात चालतात त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेलाच नाही. अरुंद गल्ल्या, खड्डे, गर्दी, अस्वच्छता अशीच परिस्थिती या परिसरात दिसते. पर्यटकांना आकर्षण असणाऱ्या तुळशीबागेची परिस्थितीही अशीच आहे. शनिवारवाडा, कसबा गणपती मंदिर, मंडई या भागाला पर्यटक भेट देतात. मात्र त्याच्या अगदी जवळ असलेल्या या परिसराची माहितीच नसल्यामुळे तेथे भेट दिली जात नाही. इथे तयार होणाऱ्या वस्तूंचे ब्रँडिंगही फारसे होताना दिसत नाही. त्यामुळे पुण्यात येऊनही पगडी, तांब्याचे घंगाळ ‘आठवण’ म्हणून खरेदी करण्याऐवजी पर्यटकांची पावले राजस्थानी, गुजराथी हस्तकलांच्या दुकानांकडे वळताना दिसतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional business ignored in terms of tourism