अतुल सुलाखे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धरावा स्वयें आत्मा खचू देऊं नये कधीं

आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला

– गीताई ६-५

समाजात आदराचे स्थान असणाऱ्यांची समज आणखी वाढवण्याचा विनोबांचा प्रयत्न आहे. त्यांच्या गीता प्रवचनांचे श्रोते अत्यंत दर्जेदार होते. त्यांनी देशपातळीवर नेतृत्वही केले. विनोबांचे सोळाव्या अध्यायाचे विवेचन म्हणजे आत्मकल्याणाची दिशा आहे. आसुरी संपत्तीचे वर्णन करताना ते म्हणतात,

‘कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठें अस’ असे सर्वाना वाटत असते.  मी म्हणे भारद्वाज कुळातला! ती परंपरा माझी अव्याहत चालली आहे. पाश्चात्त्यातही असेच आहे. आमच्या नसांत म्हणे नॉर्मन सरदारांचे रक्त आहे! आपल्याकडे गुरुपरंपरा असते ना. मूळ आदिगुरू म्हणजे शंकर. मग ब्रह्मदेव, मग नारद मुनी, मग व्यास. मग आणखी एखादा, ऋषी. मग आणखी मध्ये दहा-पाच लोक घालून मग स्वत:चा गुरू, मग मी – अशी परंपरा दाखवावयाची.

आपण मोठे आपली संस्कृती श्रेष्ठ, असे वंशावळीवरून सिद्ध करावयाचे. अरे तुझी संस्कृती उत्तम असेल तर तुझ्या कृतीतून ती दिसू दे. तिची प्रभा आचरणातून फाकू दे. परंतु ते नाही. जी संस्कृती स्वत:च्या जीवनात नाही, स्वत:च्या घरात नाही, ती जगभर फैलावू पाहणे या विचारसरणीला आसुरी म्हणतात.

ज्याप्रमाणे माझी संस्कृती सुंदर, त्याप्रमाणे जगातील सारी संपत्ती घ्यावयास लायक मीच. सारी संपत्ती मला पाहिजे व मी ती मिळविणार. ती संपत्ती का मिळवावयाची? तर बरोबर वाटणी करण्यासाठी! यासाठी स्वत:स संपत्तीत पुरून घ्यावयाचे! हल्लीच्या आसुरांस असेच वाटते की संपत्ती सारी एकत्र करावयाची. का? तर ती पुन्हा वाटण्यासाठी.

त्यासाठी मला सत्ता हवी. सारी सत्ता एका हाती केंद्रीभूत झाली पाहिजे. ही तमाम दुनिया माझ्या तंत्राखाली राहिली पाहिजे. स्व-तंत्राप्रमाणे, माझ्या तंत्राप्रमाणे चालली पाहिजे. माझ्या ताब्यात जे असेल, माझ्या तंत्राप्रमाणे जे चालेल, तेच स्व-तंत्र. अशा प्रकारे संस्कृती, सत्ता व संपत्ती या मुख्य तीन गोष्टींवर भर आसुरी संपत्तीत दिला जातो.

हे सारे लक्षात घेऊन सृष्टीत बेताने राहा, संयमपूर्वक वागा. बेताल वागू नका. लोकसंग्रह करणे याचा अर्थ लोक म्हणतील तसे वागणे हा नव्हे. माणसांचे संघ वाढविणे, संपत्तीचे ढीग जमा करणे, म्हणजे सुधारणा नव्हे. संख्येवर विकास अवलंबून नाही. आसुरी संपत्ती सतत वाढत राहिली तर मानव उन्मत्त होईल आणि शेवटी मनुष्याला फाडफाडून खाईल यात तिळमात्र शंका नको.

अव्यक्त परमात्मा सर्वत्र भरून राहिला आहे. तो तुमची काळजी घेईल. प्रथम तू मुक्त हो. पुढचे फार नको पाहू. सृष्टी व मानवजात यांची नको काळजी. तुझी नैतिक शक्ती वाढव. काम-क्रोध झडझडून टाक. ‘आपुला तो गळा घेई उगवूनि’ – तुझी मान सापडली आहे ती आधी वाचव. इतके केलेस तरी पुष्कळ झाले.

गीता प्रवचनांच्या निमित्ताने समाजातील दुर्गुणांचे विनोबांनी दिग्दर्शन केले आणि दैवी संपत्तीच्या विकासासाठी एक यज्ञ आयोजित केला. त्याचे नाव ‘भूदान यज्ञ!’

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya vinoba bhave bhoodan yagna bhoodan movement zws