अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शत्रूवर प्रेम करणे सर्वात सुरक्षित.

– विचारपोथी, विनोबा

गो-स्वामी तुलसीदासजींच्या रचनेमध्ये थोडा बदल केला की सत्याग्रहाचा गांधीप्रणीत अर्थ उकलतो. खरेतर मूळ ‘रामदूत’ शब्दही ठीक वाटला असता. गांधीजी आणि विनोबांची रामनामाविषयीची अभंग निष्ठा पाहिली की त्यांना आधुनिक काळातील ‘रामदूत’ म्हणता येतेच. परंतु मग त्यात विचारप्रधानता राहणार नाही. त्यामुळे ‘संत वीर’ म्हणणेच योग्य ठरेल आणि त्यामुळे सत्याग्रह विचार केंद्रस्थानी राहील.

संत आणि वीर या दोन शब्दांमधे आपल्याकडच्या दोन भव्य परंपरा सामावल्या आहेत. इथे संत, गाथा या मध्ययुगीन गोष्टी आहेत, असा समज झाला असेल तर तो गैर आहे. विनोबांच्या मते या संकल्पना वेदांइतक्याच प्राचीन आहेत. वीरांची परंपरा किती जुनी आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

विनोबांच्या मते, भारतात दोन विचारप्रवाह चालत आले आहेत. पहिला आहे, ‘वैराने वैर वाढते म्हणून निर्वैर राहायला हवे.’ दुसरा आहे, ‘समाजात कुठेही अन्याय होत असेल, तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे.’ पहिला विचारप्रवाह म्हणजे संतांची परंपरा. कबीर, तुलसीदास या प्रवाहात येतात.

दुसरा प्रवाह वीरांचा. अन्याय प्रतिकाराच्या प्रवाहात महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय आदि वीर आणि वीरांगना यांचा उदय झाला. अन्यायाचा प्रतिकार शस्त्रानेदेखील केला पाहिजे असे त्यांनी मानले. तथापि त्यांनी स्वत:हून कोणावर आक्रमण केले नाही. प्रतिकार करू पण स्वत:हून कोणावर आक्रमण करणे अन्यायाचे आहे.

गांधीजींनी संत परंपरा आदर्श मानली आणि तिला प्रतिकाराशी जोडले. त्यांनी म्हटले, आम्ही निर्वैर राहू तथापि प्रतिकारही करू. जगासमोर हा एक फार मोठा विचार त्यांनी ठेवला. एरवी समाजात बुद्धिभेद सुरू राहिला असता आणि समाजाचे तुकडे पडले असते. सत्याग्रहामुळे दुग्धशर्करा न्यायाने निर्वैरता आणि प्रतिकार यांचे ऐक्य झाले. दोन्ही विचारधारांचे बळ वाढले.

सत्याग्रहापूर्वी लोक प्रेमाचे महत्त्व जाणत होते तथापि, प्रेम आपले रक्षण करेल असा त्यांचा विश्वास नव्हता. हेच ज्ञानाच्या बाबतीतही लागू आहे. ज्ञानाचे महत्त्व लोकमान्य असले तरी ज्ञानरक्षकही आहे, असा विश्वास नसतो. त्यामुळेच एकीकडे सैन्य आहे आणि दुसरीकडे शिक्षण खातेही आहे, असा विरोधाभास दिसतो. मोठे लोक हा विरोधाभास कमी करण्याचा प्रयत्न करतात पण ही शिलाई टिकाऊ नसते.

सर्वोदयात सत्याग्रहाचे जे दर्शन झाले त्यामुळे ही शिलाई कमी झाली. ताणाबाणा नष्ट होऊन एकरूप होऊन अखंड वस्त्र तयार झाले. सत्याग्रहात संत आणि वीर या दोन्ही परंपरा एकरूप होतात हे त्या मार्गाचे वैशिष्टय़ आहे.

गांधीजींना आपले सत्याग्रह कितीही अपुरे वाटत असले, तरीही त्याची बलस्थाने विनोबांनी नेमकेपणाने सांगितल्याचे दिसते. गांधीजींच्या नंतरचा सत्याग्रहाचा मार्ग कसा विकसित झाला हे लेखाच्या सुरुवातीला आलेल्या विनोबांच्या वचनातून स्पष्ट होते. शत्रू समोर आला तरी आम्ही प्रेमरूपी शस्त्रानेच त्याचा प्रतिकार करू.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog gandhi s concept of satyagraha acharya vinoba bhave thought on satyagraha zws
First published on: 06-10-2022 at 02:34 IST