शिक्षणाला वयाचं बंधन नसतं आणि मनुष्य हा जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकतच असतो. असे आपण नेहमी ऐकत असलो तरीही आयुष्यात प्रत्यक्ष शिक्षणाचा टप्पा एका मर्यादेत संपतो. साधारण ३० वर्षापर्यंत आपले शिक्षण होऊन आपण पुढील गोष्टींना सुरुवात केलेली असते. आता याला काही जण अपवाद निश्चितच असू शकतात. लग्नानंतर किंवा अगदी वयाच्या ५० व्या वर्षीही पीएचडी किंवा तत्सम पदवी घेणारे काही जण असतात. पण आता तुम्ही जी गोष्ट ऐकाल ती निश्चितच वेगळी आणि प्रेरणा देणारी आहे. ९८ व्या वर्षी कोणी एखादी पदवी घेऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसेल? पण हो, हे खरे आहे. राजकुमार वैश्य या ९८ वर्षांच्या गृहस्थांनी या वयात आपली अर्थशास्त्रातील एम.एची पदवी घेतली आहे. त्यामुळे तरुणांना वाजवेल अशी त्यांची इच्छाशक्ती खऱ्या अर्थाने थक्क करणारी आहे.
राजकुमार यांनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच नालंदा विद्यापीठातून २ वर्षात ही पदवी घेतली आहे. वय झाले आता शिकून काय करायचे असे न समजता त्यांनी आपल्यातील शिकण्याची जिद्द कायम ठेवली आहे. त्यांचे वय पाहून त्यांना परिक्षेसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या. मात्र राजकुमार यांनी त्या नाकारत मी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देणार असल्याचे सांगितले. आपल्या या वयात परीक्षा देण्याबाबत राजकुमार म्हणतात, कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते. मी माझे स्वप्न पूर्ण केले असून मी आता पदव्युत्तर पदवी घेतली आहे. प्रत्येकाने सतत प्रयत्नशील असायला हवे असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.
राजकुमार यांचा १९२०मध्ये उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जन्म झाला. त्यांनी १९३४ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी १९३८मध्ये बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विधी शाखेचा अभ्यास करुन बिहारमधील एका कंपनीत नोकरी केली. या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते पटणामध्ये राहतात. गंमत म्हणजे त्यांची मुले आणि सुनाही पटना विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी ५० टक्के गुण मिळवत एम.ए इन इकॉनॉमिक्स ही पदवी मिळवली आहे. सध्या ते अर्थशास्त्रावर एक पुस्तकही लिहीत आहेत. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून गरीबी कमी करण्यासाठी उपाय सुचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.