Rajathan Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. त्यानंतर या व्हिडीओ किंवा फोटोंची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना अनेकदा पाहायला मिळते. आता देखील अशाच प्रकारे एका अनोख्या चहा वाल्याचे काही फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय म्हणजे या तरुणाने एक अनोखा चहाचा स्टॉल उघडला असून तो बेड्या घालून चहा विकत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे याकडे नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील हा युवक राजस्थानमधील बारन येथील असल्याचं सांगितलं जात आहे. बरान जिल्ह्यातील अंता शहरात या युवकाचा हा अनोखा चहाच्या स्टॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या चहाच्या स्टॉलचं नाव ‘४९८ अ Tea Cafe’ असं ठेवलं आहे. या युवकाचं नाव कृष्ण कुमार धाकड उर्फ ​​केके असल्याचं सांगितलं जात आहे. हा युवक बेड्या घालून चहा बनवतो आणि विकतो. तसेच त्याने तेथे लावलेल्या होर्डिंग्जवर लिहिलं आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चहा उकळत राहील. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या युवकाने त्याचा हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला आणि कायदेशीर अन्यायाला विरोध करण्यासाठी त्याने ‘४९८ ए टी कॅफे नावाच्या चहाचा स्टॉल उघडल्याचं सांगितलं आहे. तसेच वृत्तानुसार, ज्या कलमाअंतर्गत त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल केला आहे, याचा निषेध म्हणून त्या युवकाने त्याच्या चहाच्या स्टॉलचं नाव असा पद्धतीचं ठेवलं आहे. तसेच निषेध म्हणून तो हातात बेड्या घालून चहा विकत आहे. तसेच त्याच्या चहाच्या स्टॉलभोवती त्याने काही पोस्टर्स लावले आहेत आणि त्यावर लिहिलं आहे की, “जब तक नही मिलता न्याय, तब तक उबलती रहेगी चाय” असं लिहिलेलं दिसत आहे.

दरम्यान, या युवकाने २०१८ मध्ये मीनाक्षीशी लग्न केलं होतं. त्यानंतर काही वर्ष त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. पण २०२२ मध्ये पत्नी घर सोडून तिच्या वडिलांकडे गेल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच त्यानंतर तिने या युवकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ (हुंड्यासाठी छळ) आणि कलम १२५ अंतर्गत खटले दाखल केल्याचा आरोप या युवकाने केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

खोटे खटले दाखल केल्याचा युवकाचा आरोप

खोट्या खटल्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झाल्याचं या युवकाने म्हटलं आहे. “गेल्या तीन वर्षांपासून मी न्यायासाठी न्यायालयात भटकत आहे. माझी एक वृद्ध आई आहे जी माझ्यावर अवलंबून आहे. मी एका शेडखाली राहतो आणि आता माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. मी अनेक वेळा माझं जीवन संपवण्याचा विचार केला, पण नंतर मला आठवलं की मी माझ्या आईचा एकमेव आधार आहे”, असं कृष्णा धाकड याने सांगितल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.

तसंच कृष्णाने पुढे म्हटलं की, “मी ठरवलं आहे की कायद्याच्या गैरवापरामुळे ज्या भागात मी अडकलो त्याच भागात चहा विकून निष्पक्षपणे ही कायदेशीर लढाई लढेन. मी जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा मला फक्त तारिख पे तारिख मिळते. न्याय कुठेही दिसत नाही. आता मी थकलो आणि त्यानंतर अंता येथेच चहाची टपरी चालू केली आहे”, असं त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांची पत्नी मीनाक्षीने आरोप केला आहे की, “पतीने माझ्या वडिलांकडून जमीन खरेदी करण्यासाठी पैसे मागितले आहेत. पण त्यासाठी नकार दिल्यानंतर मला मारहाण करण्यात आली. त्यानंतर मी माझ्या वडिलांच्या घरी परतले. मी घटस्फोटासाठी तयार आहे. पण आधी माझ्या नावावर घेतलेले सर्व पतीने फेडावं”, असं म्हटलं आहे.